जळगाव : जळगाव शहरात शाळकरी विद्यार्थ्यांमधील वाद थेट जीवघेण्या हल्ल्यापर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुसुंबा येथील १५ वर्षीय आयुष गजानन भोपळे या दहावीच्या विद्यार्थ्यावर त्याच वर्गातील विद्यार्थ्याने चॉपरने प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या मारहाणीच्या रागातून हा हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. अयोध्या नगरातील श्रीराम मंदिर आणि बी.यू.एन. रायसोनी शाळेजवळ सकाळी साडेदहा वाजता ही घटना घडली. हल्ल्यात आयुषच्या बरगडीवर वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. जखमी विद्यार्थ्याचे वडील गजानन प्रभाकर भोपळे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करून संबंधित विद्यार्थ्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे शाळा परिसरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.