जळगाव : अमळनेर तालुक्यातील टकरेखेडा परिसरात गुरुवारी (२७ ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास अत्यंत विदारक आणि धक्कादायक घटना घडली. पती-पत्नीने आपल्या दोन निष्पाप चिमुकल्या मुलींसह भरधाव रेल्वेखाली झोकून देत जीवन संपवले. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण अमळनेर तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुनील अमृत भिल, त्यांची पत्नी पार्वती सुनील भिल आणि त्यांच्या दोन लहान मुली अशी या दुर्दैवी घटनेत जागीच मृत्यू झालेल्या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, टकरेखेडा शिवारातील रेल्वे रुळावर गुरुवारी पहाटे ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. भिल दाम्पत्याने कोणत्या तरी अनाकलनीय नैराश्यातून किंवा कौटुंबिक विवंचनेतून दोन्ही चिमुकल्यांना सोबत घेऊन धावत्या रेल्वेसमोर उडी घेत जीवन संपवले, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. रेल्वेचा वेग प्रचंड असल्याने चौघांचाही जागीच मृत्यू झाला. पहाटेच्या वेळी रेल्वे रुळाजवळ मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चौघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात रवाना केले आहेत. एवढे टोकाचे पाऊल उचलण्यामागे नेमके कारण काय होते, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणात प्रेमसंबंधातून वाद झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, या चर्चेला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. नेमके कारण पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच टकरेखेडा गावावर आणि भिल कुटुंबीयांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.