Chalisgaon Youth Killed
चाळीसगाव : बसस्थानक परिसरात दुकान लावण्याच्या कारणावरून सुरू असलेल्या जुन्या वादातून 27 वर्षीय तरुणाचा विटांनी मारहाण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय भानुदास पाटील (वय 27, रा. लक्ष्मीनगर, चाळीसगाव) हा आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याचे आणि निखील उर्फ भोला सुनील अजबे यांचे बसस्थानकाच्या मागील भागात दुकान लावण्याच्या कारणावरून वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे.
गुरूवारी (दि. 18) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास निखील अजबे याने बोलावल्याचे सांगून अक्षय घरातून बाहेर पडला. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. त्याचा शोध घेतल्यानंतरही तो आढळून आला नव्हता.
दरम्यान, शुक्रवारी (दि. 19) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी अक्षयच्या कुटुंबीयांना त्याच्यावर मारहाण झाल्याची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीय ग्रामीण रुग्णालयात पोहोचले असता अक्षयच्या डोक्यावर व तोंडावर गंभीर दुखापती झालेल्या दिसून आल्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
घटनास्थळी पाहणी केली असता मांगारवाडी वाडा परिसरातील एका पडीक घरासमोर रक्ताचे थारोळे तसेच रक्ताने माखलेल्या विटांचे तुकडे आढळून आले. यामुळे अक्षयवर विटांनी हल्ला करून त्याचा खून करण्यात आल्याची खात्री झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी मृताचे वडील भानुदास राजाराम पाटील (वय 75, रा. लक्ष्मीनगर, चाळीसगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निखील उर्फ भोला सुनील अजबे याच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.