जळगाव : जिल्ह्यात संभाव्य किंवा उद्भवलेल्या आपत्तीजन्य परिस्थितीचा विचार करून जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्काळ सेवेत हजर राहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 25 (2)(अ) नुसार जिल्हाधिकारी हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात. या अधिकाराच्या आधारे, अधिनियमाच्या कलम 30(2)(iv), 30(2)(xvi) व 34(a) अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार शुक्रवार (दि.9) पासून पुढील आदेशापर्यंत सर्व पूर्वमंजूर रजा रद्द करण्यात आल्या आहेत. सध्या रजेवर असलेले अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ सेवास्थळी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. कोणीही अधिकारी अथवा कर्मचारी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता रजा घेऊ शकणार नाही किंवा मुख्यालय सोडू शकणार नाही.
कार्यालय प्रमुखांची जबाबदारी : संबंधित कार्यालय प्रमुखांनी या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करून अनुपालन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. तसेच पालन न केल्यास कारवाई करण्यात येणार असून परिपत्रक प्रशासनिक अत्यावश्यकतेच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आले आहे. पालन न केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला आहे.