जळगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला सामाजिक न्याय, समता, बंधुता व धर्मनिरपेक्षतेचा संदेश आजही मार्गदर्शक आहे. भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्यांना हक्क व अधिकार बहाल केले. त्यांचे विचार आणि कार्य सदैव प्रेरणादायी असल्याच्या भावना पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केल्या. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, विविध शासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा प्रशासन, जळगाव महानगरपालिका व सामाजिक न्याय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
भुसावळ रेल्वे स्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ विधानसभा भवनाचे शिल्प उभारण्यात आले असून रविवार (दि.13) रोजी रात्री भीमसैनिकांनी केक कापून आनंदोत्सव साजरा केला. तसेच फटाके फोडून आतिषबाजी करण्यात आली. डॉ. बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी अनेक मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मोटरसायकल भीम रॅली, रक्तदान शिबिरे यासारखे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. काही ठिकाणी वंचित घटकातील गरजू मुलांना शालेय साहित्य व पुस्तकांचे वितरण करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.