Jalgaon News
जळगाव : नरेंद्र पाटील
जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या हातनूर धरणातून यंदा पाणी चक्क 'उडून' गेले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा धरणातील पाणीसाठ्यात तब्बल ७ टक्क्यांची घट झाली असून, याचे मुख्य कारण वाढलेले बाष्पीभवन असल्याचे स्पष्ट होत आहे. सुर्याच्या वाढत्या प्रकोपाने यंदा हातनूरमधील जल वर्षात ४२.६० दलघमी पाणीसाठा कमी झाला आहे.
गतवर्षी ३१ मार्च २०२५ रोजी हातनूरमध्ये ६०.५९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र, आज म्हणजेच ३१ मार्च २०२६ रोजी हा साठा ५३.९२ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. म्हणजेच तुलनेत सुमारे ६.६७ टक्क्यांनी साठा घटला आहे. जिवंत जलसाठ्यातही १७ दलघमीची मोठी तूट निर्माण झाली आहे.
यावर्षी जलसाठा कमी असण्यामागे केवळ वापर कारणीभूत नसून निसर्गाचा कोपही कारणीभूत आहे. जलवर्षाच्या (१ जुलै ते ३१ मार्च) आकडेवारीनुसार:
२०२४-२५ मध्ये बाष्पीभवन: ४०.६५ दलघमी
२०२५-२६ मध्ये बाष्पीभवन: ४२.६० दलघमी
म्हणजेच गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास २ दलघमी अतिरिक्त पाणी केवळ बाष्पीभवनामुळे कमी झाले आहे. उष्णतेची लाट आणि कोरड्या हवामानामुळे धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात वाफेच्या स्वरूपात उडून जात असल्याने प्रशासनापुढील आव्हाने वाढली आहेत.
एकिकडे पाणीपातळी २१२.१५० मीटरवरून २११.७९० मीटरवर आली आहे, तर दुसरीकडे दिवसाला सरासरी ८.१ दलघमी पाणी बाष्पीभवनाद्वारे कमी होत आहे. जर बाष्पीभवनाचा हाच वेग कायम राहिला, तर मे आणि जून महिन्यात हातनूरचा तळ गाठला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिंचनासाठी आणि पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचे नियोजन आतापासूनच कडक करावे लागणार आहे, अन्यथा जळगावकरांना भीषण टंचाईचा सामना करावा लागू शकतो.
३१/३/२०२५ ची नोंद
पाणी पातळी २१२.१५० मी
जलसाठा २८७.५० द.ल.घ.मी.
जिवंत जलसाठा १५४.५० द.ल.घ.मी.
टक्केवारी ६०.५९%
बाष्पीभवन ८.७ द.ल.घ.मी.
३१/०३/२०२६ ची नोंद
पाणी पातळी २११.७९० मी
जलसाठा २७०.५० द.ल.घ.मी.
जिवंत जलसाठा १३७.५० द.ल.घ.मी.
टक्केवारी ५३.९२%
बाष्पीभवन ८.१ द.ल.घ.मी.