जळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने महसूल संरक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत वित्त वर्ष 2025–26 मध्ये चार तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी तिकीट तपासणीद्वारे १ कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळवून ‘करोडपती’ होण्याचा मान मिळवला आहे. या कर्मचाऱ्यांनी दक्ष व सातत्यपूर्ण तिकीट तपासणीद्वारे प्रत्येकी ₹१ कोटींपेक्षा अधिक महसूल मिळवून रेल्वेच्या उत्पन्न संरक्षणात मोलाचे योगदान दिले आहे.
भुसावळ विभागातील ‘करोडपती’ तिकीट तपासणी कर्मचारी पुढीलप्रमाणे आहेत:
- श्री निसार खान, टीटीआय, भुसावळ – ₹1.47 कोटी
- श्री एस. के. गुप्ता, सीटीआय, भुसावळ – ₹1.16 कोटी
- श्री के. के. पटेल, टीटीआय, भुसावळ – ₹1.02 कोटी
- श्री डी. एन. चौधरी, सीटीआय, भुसावळ – ₹1.00 कोटी
वरील सर्व कर्मचाऱ्यांनी चालू आर्थिक वर्षात तिकीट तपासणीद्वारे ₹१ कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळवत ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे.
विशेष म्हणजे ही यशस्वी कामगिरी फक्त या चार कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित नसून आणखी पाच कर्मचारी ₹१ कोटींच्या उंबरठ्यावर असून लवकरच तेही या यादीत समाविष्ट होण्याची शक्यता आहे. त्यांची निष्ठा आणि उत्कृष्ट कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आहे; यामुळे रेल्वे महसुलाचे होणारे मोठे नुकसान वाचवण्यात मोलाचा हातभार लागला आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे तिकीट तपासणी विभागाची प्रतिष्ठा खऱ्या अर्थाने उंचावली असून, इतरांनी अनुकरण करावे असा एक प्रेरणादायी आदर्श त्यांनी निर्माण केला आहे.
मध्य रेल्वे प्रवाशांना आवाहन करते की, कृपया अधिकृत विक्रेते, रेल्वे स्थानकावरील बुकिंग खिडक्या, एटीव्हीएम किंवा http://www.irctc.co.in या संकेतस्थळाद्वारे जारी केलेली वैध तिकिटे घेऊनच प्रवास करावा. प्रवासी त्यांच्या मोबाईल फोनवर 'Rail One' ॲप डाउनलोड करून त्याद्वारे तिकिटे आरक्षित करू शकतात. विनातिकिट प्रवासाबाबतच्या आपल्या 'शून्य-सहिष्णुता' धोरणाचा रेल्वेकडून पुनरुच्चार करण्यात येत असून, प्रवाशांना आरामदायी आणि सन्मानजनक प्रवास अनुभवता येईल, याची खात्री करण्यासाठी रेल्वे कटिबद्ध आहे.