जळगाव : तालुक्यातील वडली येथील शेत शिवारामध्ये काम करीत असताना शेतकरी दांपत्यावर मधमाशांच्या झुंडीने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये पतीचा मृत्यू झाला आहे. पत्नीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील वडली येथे विकास चूडामण पाटील (वय ५५, रा. वडली ता. जळगाव) हे पत्नी, दोन मुले यांच्यासह राहत होते. ते शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. गुरूवारी (दि.१७) जवखेडा शिवार येथे सकाळी १० ते ११ वाजताच्या दरम्यान शेतात काम करीत असताना अचानक मधमाशांच्या झुंडीने विकास पाटील आणि त्यांची पत्नी रत्नाबाई विकास पाटील (वय ५०) यांच्यावर हल्ला केला.ही घटना ग्रामस्थांना कळताच त्यांनी दोघांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विकास चुडामन पाटील यांना तपासून मृत घोषित केले. तर रत्नाबाई विकास पाटील यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती कळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. प्रगतशील शेतकरी आणि मनमिळाऊ स्वभावाचे विकास पाटील यांच्या मृत्यूमुळे वडली गावामध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या मृत्यूप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.