जळगाव, पुढारी वृत्तसेवा :
भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथील दोन युवकांकडून तब्बल ३ लाख एक हजार ५०० रुपये किंमतीचे रेल्वेतून चोरलेले ३० मोबाईल जप्त केले आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना ५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत सुनावण्यात आली. वैभव विष्णू कवळे आणि सागर माणिक इंगळे (धरणगाव, ता.मलकापूर, जि.बुलढाणा) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.
रेल्वेमधून प्रवाशांच्या मोबाईल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहे. बुलढाणा तालुक्यातील रहिवासी गोपाल किसन जवंजाळ हे १६ सप्टेंबरला मुंबई हावडा मेलने मुंबई-मलकापूर असा प्रवास करीत होते. या प्रवासादरम्यान चोरट्याने त्यांचा १८ हजार ५०० रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला. त्यांना भुसावळ येथे जाग आल्यावर मोबाईल चोरीची घटना समोर आली. त्यांनी भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
भुसावळ लोहमार्गचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोहमार्ग पोलीस ठाण्यातील कर्मचारी अजित तडवी, जगदीश ठाकुर, धनराज लुले, दिवाणसिंग राजपूत, सागर खंडारे व रेल्वे सुरक्षा बलाचे प्रमोद चौधरी यांना गुप्त माहिती मिळाली की काही चोरटे मलकापूर येथे चोरीतील मोबाईल बाजारात विकण्यासाठी येणार आहे. या माहितीवरून पोलिसांनी मलकापूर येथे जाऊन सापळा लावला. मलकापूर येथील सारथी कपड्यांच्या दुकानाजवळून पोलिसांनी वैभव कवळे आणि सागर इंगळे (रा. दोन्ही रा.धरणगाव, तालुका मलकापूर) यांच्या मुसक्या आवळल्या.
चोरीचे तब्बल 30 मोबाईल जप्त
चोरट्यांची तपासणी केली असता त्यांच्याजवळ तीन लाख १हजार ५००रुपये किमतीचे एकूण ३० मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले. दोन्ही संशयीतांना रविवारी रात्री अटक करून सोमवारी न्यायालयात नेले असता ६ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, डीवायएसपी दीपक काजवे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक घेरडे आणि आरपीएफचे निरीक्षक राधाकृष्ण मीना यांनी ही कारवाई केली. हवालदार श्रीकृष्ण निकम या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.