नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा
मध्य रेल्वेच्या टिटोली यार्डात रेल्वे प्रशासनातर्फे 28 मे ते 1 जून दरम्यान तांत्रिक काम हाती घेण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सहा दिवस मेगाब्लॉक राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
या कामामुळे गाडी क्रमांक 01202/1 मनमाड मुंबई-मनमाड गोदावरी स्पेशल ट्रेन 28 मे ते 2 जून दरम्यान दोन्ही दिशेने धावणार नाही. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक 12071 जालना जनशताब्दी एक्स्प्रेस 30 व 31 मे रोजी तसेच परतीची 12072 जालना मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस दिनांक 31 मे आणि 1 जून रोजी स्थानकापासूनच पूर्णपणे रद्द होईल. भुसावळ ते इगतपुरी स्टेशनदरम्यान धावणारी मेमू गाडी इगतपुरीपर्यंत न येता नाशिकरोड स्टेशनपर्यंतच धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. चार दिवस प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
प्रवासी व चाकरमान्यांची गैरसोय होणार
मेगाब्लॉकच्या काळात नाशिकरोड रेल्वेस्थानकातून मुंबईला जाणार्या मेल, एक्स्प्रेस नियंत्रित करून चालवण्यात येणार असल्याने एक ते दोन तास उशिराने धावतील. तर मुंबईहून नाशिककडे जाणार्या लांब पल्ल्याच्या मेल व एक्स्प्रेस नाशिकरोडपर्यंत एक ते दोन तास उशिराने धावण्याची शक्यता आहे. नाशिकरोडनंतर सुरळीत जातील. मेगाब्लॉकच्या काळात 152 ट्रेन विस्कळीत होऊन याचा परिणाम रेल्वेच्या वेळापत्रकावर होणार असल्याने प्रवासी व चाकरमान्यांची काहीशी गैरसोय होणार आहे.