बाजारात आल्या अस्सल पावसाळी रानभाज्या!  
धुळे

Wild Vegetables | ‘कुंजरू, दिंडा, फांग, मटारु, केना, गुळवेल, राजगिरा, धोदाडा, काटे माठ, आघाडा’ : बाजारात आल्या अस्सल पावसाळी रानभाज्या!

रानभाज्या आहेत आरोग्याचा खजिना, साक्री तालुक्यातील आदिवासी बांधवांकडून रानभांज्यांची उपलब्धता

पुढारी वृत्तसेवा

अंबादास बेनुस्कर

पिंपळनेर : साधारणपणे पावसाची रिपरिप सुरू झाली की,रानभाज्या बाजारात डोकावू लागतात. या भाज्यांच्या चवीची आणि औषधी गुणधर्माची जाण असलेले लोक त्यांच्याकडे आवर्जून वळतात. प्रेमाने,आवडीने या भाज्या बनवून खाल्ल्या जातात. वनात जाणे शक्य नसल्याने काही भाज्या या आता ग्रामीण भागातील आठवडा बाजारात विक्री होताना दिसून येतात. रानभाज्यांचे महत्त्व लक्षात यावे यासाठी साक्री तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्यातील बारीपाडा येथील रानभाज्यांचे उत्सवही साजरे केले जातात. तर रानभाज्यांचा हाच उपक्रम आता राज्यभर होताना दिसतो.

पावसाळ्यात जंगलात,डोंगराळ भागात व शेतशिवारात या भाज्या वाढतात. या भाज्या नेमकेपणाने ओळखून त्या खुडणाऱ्या आदिवासी पश्चिम पट्यातील महिला व इतर शेतकरी बाजारात त्या विक्रीसाठी घेऊन येतात.

या भाज्यांचा समावेश

यात पानाचा ओवा, कुंजरू, दिंडा, फांग, मटारु, केना, गुळवेल, राजगिरा, धोदाडा, काटे माठ, आघाडा, कढीपत्ता,कुरडू, मशरूम,आवळी, उळाशी, चूस, आळू, फणस, माठ, जंगली शेवगा, शेपू, कडूकंद, नाळगोथ, पानफुटी, रानवांगी तेरा, चिवळ, नाळगुट, पाथरी, टाकळा, बांबु, नागवेल, तांदूळजा, करटोली, पिंपळ, उंबर, कुडा, कपाळ कोडी, खापरखुटी, अंबाडी, भुई आवळा, सुरण, अंबुशी, मायाळू, अक्कलकारा, चाईची भाजी या सर्व रान भाज्यांची सध्या आवक वाढत आहे. कुर्दला जंगली राजगिरा किंवा चवळी असेही म्हणतात. पावसाळ्यात ते खूप खाल्ले जाते. कुई (कुई) लाल, पिवळा, केशरी आणि काही अगदी हलका जांभळा अशा वेगवेगळ्या रंगांचा असतो.

रानभाजी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

रानभाज्यामध्ये क्लोरोफिल नावाचे घटकद्रव्य भरपूर प्रमाणात असते.ते पचनसंस्थेसह शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीही वाढवते.या ऋतूमध्ये रानभाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीराला दीर्घकाळ आरोग्यदायी लाभ होतात.

मजबूत हाडांसाठी रानभाजी

शरीरातील हाडे मजबूत होण्यासाठी पावसाळ्यातील रानभाजी ही आवर्जून खाल्ली जाते. यामुळे पावसाळ्यात शरीरातील हाडांना बळकट करण्यासाठी रानभाजी खाणे हा औषधी गुणधर्म आहे. रानभाजीमध्ये प्रोटिन्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळेच पावसाळ्यात ग्रामीण भागातील आठवडे बाजारामध्ये रानभाजी विक्रीसाठी दिसून येते.

पाऊस लांबल्याने रानभाज्या बाजारात लांबल्या

पाऊस लांबल्याने रानभाज्या या आठवडे बाजारात विक्रीसाठी उशिरा येऊ लागल्या आहेत. पावसाची रिपरिप आता सुरू झाल्याने येणाऱ्या पुढील तीन महिन्यांत रानभाज्या खाण्यासाठी उपलब्ध राहतील, असे आदिवासी भागातील नागरिक सांगतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT