पिंपळनेर, जि.धुळे : सध्या सुरु असलेल्या पितृपंधरवड्यामुळे विविध प्रकारच्या भाज्यांना मागणी वाढली आहे. त्यामुळे भाज्यांच्या दरातही 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही वाढ पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज पिंपळनेरच्या भाजी मार्केट मधील विक्रेते व्यक्त करत आहेत. पितृपंधरवड्यात गवार,भेंडी,कारली,चवळीच्या शेंगा, कोहळा,मुळा,आले,अळूची पाने,काकडीसह विविध प्रकारच्या पालेभाज्यांना दरवर्षी मोठी मागणी असते. या भाज्यांची मागणी वाढल्यामुळे दर कमी होण्याची शक्यता नाही. उलट मागणीच्या तुलनेत भाज्यांची आवक न झाल्यास आणखी दर वाढू शकतात.
सद्यस्थितीत वाढलेल्या मागणीमुळेच घाऊक आणि किरकोळ बाजारातही भाज्यांचे भाव वाढल्याचेही भाजी व्यापारी नमूद करत आहेत. बाजारात भाजीपाला पितृपंधरवड्यानिमीत लागणाऱ्या भाज्यांची आवक साक्री तालुक्यात होत आहे. पावसाची सध्या उघडझाप सुरू आहे. बाजारात दाखल भाज्यांचा दर्जाही चांगला आहे.
पितृपधरवड्यात काही फळानाही मागणी राहते. पेरण,केळी आणि डालियाला मागणी वाढल्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात या फळांच्या दरात वाढ झाली आहे. पेरू आणि केळीच्या तुलनेत डाळिंबाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात डाळींबाचा प्रतिकिलोचा भाव 100 ते 200 रुपये,केळी 50 ते 60 रुपये डझन,पेरूचा किलोचा भाव दर्जानुसार 80 ते 100 रुपये तर सफरचंद 200 ते 240 रुपये प्रमाणे विक्री चालू आहे.
गवार गावरान-200 रुपये किलो,गवार चायना-128 रुपये किलो,भेंडी-80 रुपये किलो,कारली-80 रुपये किलो,चवळी-100,काकडी-80 रुपये किलो,अळूची पाने-20 रुपये गड्ढ़ी,शेवगा शेंग-100 रुपये किलो,गाजर-80 रुपये किलोने विक्री केली जात आहे.