धुळे : धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. एकट्या शिरपूर तालुक्यात सुमारे ४८० शेतकरी बाधित झाले असून ३९२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पंचनामे अद्याप सुरू असल्याने नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
धुळे, शिरपूर, साक्री आणि शिंदखेडा या चारही तालुक्यांमध्ये गेल्या आठवड्यापासून अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. काल रात्रीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. वादळी वाऱ्यांमुळे काही भागांत वीजपुरवठा खंडित झाला, तर शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः फळबागा जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
पालकमंत्री जयकुमार रावल यांनी नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून जिल्हाधिकारी स्तरावर महसूल विभागाचे कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत. दरम्यान, कालच्या पावसामुळे नुकसानीत आणखी भर पडली आहे. शिरपूर तालुक्यातील सुमारे ३० गावे अवकाळी पावसामुळे बाधित झाली आहेत. बभळाजसह ग्रामीण भागात फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागात बाजरी, मका, केळी, पपई, रब्बी ज्वारी आणि गहू या पिकांवर परिणाम झाला आहे.
धुळे, साक्री आणि शिंदखेडा तालुक्यांमध्येही नुकसानीचा अंदाज घेण्याचे काम सुरू असून पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नेमकी परिस्थिती स्पष्ट होणार आहे. दरम्यान, चारही तालुक्यांतील आमदारांनी बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी सुरू केली आहे.