पिंपळनेर,जि.धुळे : "मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण" या संत तुकाराम महाराजांच्या ओव्याप्रमाणे आपण आपले मन दररोजच्या योगासने आणि प्राणायामांनी, निरोगी ठेऊ शकतो असे मत योगशिक्षक डॉ. योगेश्वर नांद्रे यांनी पिंपळनेर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कार्यशाळेप्रसंगी व्यक्त केले.
पिंपळनेर येथील कर्म.आ.मा.पाटील कला, वाणिज्य व कै.अण्णासाहेब एन. के. पाटील विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत "ताण तणाव मुक्त व कॉपी मुक्त अभियान" कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.बी.पवार, योगशिक्षक डॉ. योगेश्वर नांद्रे, महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.आनंद खरात,आयक्यूएसी संयोजक डॉ. एस.पी.खोडके, राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ.संजय तोरवणे आदी उपस्थित होते.
प्रथम सत्रात योगशिक्षक नांद्रे यांनी भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, उदगीत, उज्जैई, ई. प्राणायामांचे मानवी मेंदू निरोगी ठेवण्यासाठी व आयुष्य वाढीसाठी कसे फायदे होतात हे प्रात्यक्षिके करून घेत सर्वांनी "ताण-तणाव मुक्त जीवन कसे जगावे, आनंदी कसे रहावे याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लहू पवार यांनी मन आणि मेंदू सुदृढ ठेऊन अभ्यासात सातत्याने यश मिळवावे. विद्यापीठाच्या परीक्षांना सामोरे जाताना, महाविद्यालय कॉपीमुक्त कसे राहील यासाठी शिक्षकांनी शिकवलेल्या विषयांचा मन लावून अभ्यास करा. परीक्षांमध्ये विद्यापीठाच्या नियमावलीचे, शिस्तीचे पालन करा, ग्रंथालयातील अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचा पुरेपूर वापर करा. आपल्या महाविद्यालयाचे नावलौकिक यापुढेही कायम ठेऊन परीक्षांना सामोरे जाण्याविषयी मार्गदर्शन केले.
आयक्यूएसी संयोजक डॉ.एस.पी.खोडके यांनी स्ट्रेस फ्री जीवनाच्या विविध टिप्स विद्यार्थ्यांना यावेळी दिल्या. कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.आनंद खरात यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.