पिंपळनेर,जि.धुळे : गुन्हेगारीतून मिळवलेला अवैध पैसा हा क्षणिक सुख देतो परंतु कष्टाने कमावलेला पैसा हा सुखासोबतच समृद्धी देखील घेऊन येतो. म्हणून तरुणांनी गुन्हेगारीला बळी पडून तरुणपणी आयुष्य पोलीस स्टेशन व कोर्टात घालवू नये असे सहायक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांनी सांगितले. निजामपूर पोलीस स्टेशन गांधी जयंती कार्यक्रमाप्रसंगी ते बालेत होते.
महापुरुष राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त निजामपूर पोलीस स्टेशन आयोजित कार्यक्रमास निजामपूर - जैताने गावातील ग्रामस्थ, परवेज सय्यद, अकबर पिंजारी, हेमंत महाले परिसरातील नागरिक उपस्थित होते. निजामपूर पोलीस ठाण्याच्या सर्व कर्मचारी यांनी महापुरुषांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करत मनोगत व्यक्त केले. यावेळी निजामपूर पोलीस स्टेशनच्या आवारात व मुद्देमाल विभागात साफसफाई व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
भामरे यांनी सांगितले की, महात्मा गांधी यांनी आपल्या जीवनात हिंसा सोडून अहिंसेच्या मार्गावर चालून सत्याग्रह करून ब्रिटिशांच्या राज्य तत्वावर सत्य व अहिंसा या मार्गाने देशात क्रांती घडवून आणली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोलीस उपनिरीक्षक यांसह दीपक महाले, राकेश महाले व पोलीस मित्र अनिस पठाण व त्यांचे सहकारी मित्र साहिल जुनेद तांबोळी, इसाक मिर्जा, गोकुळ ईशी, अजय डबरू यांनी खास परिश्रम घेतले. रघुवीर खारकर यांनी सूत्रसंचलन केले व आभार मानले.