पिंपळनेर,जि.धुळे : साक्री तालुक्यातील बारापाडा, चौपाळे पंचक्रोशीत मागील आठवडा भरापासून पावसाने चांगलाच मुक्काम ठोकला आहे. हनुमंतपाडा व राईनपाडा या गावांना जोडणाऱ्या फरशी पुलावरून दीड ते दोन फूट पुराचे पाणी वाहू लागल्याने दोन्ही गावातील संपर्क काही तास तुटला आहे. (Rainpada - Hanumantpada village was cut off due to the overflow of water from the bridge)
हनुमंतपाडा व राईनपाडा या दोन्ही गावातील शेतकऱ्यांना ताटखळत थांबावे लागत आहे. काही शेतकरी, नागरिकांना दोन ते तीन कि.मी.अंतर डवण्यापाडा गावावरून फिरून ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरीकांची गैरसोय होत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून फरशी पुलाची उंची वाढवण्यात यावी अशी होत असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दरवर्षी या पूलावरुन पावसाचे पाणी गेल्यावर गावांचा संपर्क तुटल्याने विद्यार्थ्यांचे शाळेत जाणे थांबते. त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. या ठिकाणी उंच पूल बांधण्यात यावा, अशी मागणी तीन ते चार वर्षांपासून ग्रामस्थ करीत आहेत.