Kunal Patil, Girish Mahajan Pudhari
धुळे

Nar Par Girna Project | नार-पार गिरणा प्रकल्पातून बोरी पट्ट्यास पाणी द्यावे; गिरणा डावा कालवा विस्तारीकरणाची मागणी

माजी आमदार कुणाल पाटील यांची जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे मागणी

पुढारी वृत्तसेवा

Bori Belt Water Supply

धुळे : नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाचा लाभ धुळे तालुक्यातील बोरी परिसरातील गावांना सिंचनासाठी मिळावा, यासाठी आपण गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहोत. आता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती मिळाली असून जलसंपदा विभागाने ४ हजार ११६ कोटी रुपयांच्या कामांना कार्यारंभ आदेश दिला आहे. या पार्श्वभूमीवर धुळे तालुक्यातील बोरी पट्ट्यातील शेतीला या प्रकल्पातून पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे केल्याची माहिती माजी आमदार कुणाल पाटील यांनी दिली.

यासोबतच गिरणा-पांझण डाव्या कालव्याचे वाढ व विस्तारीकरण करण्याची मागणीही त्यांनी मंत्री महाजन यांच्याकडे केली आहे. उत्तर महाराष्ट्रासाठी जीवनदायिनी ठरणाऱ्या या प्रकल्पामुळे प्रदेशात जलक्रांती घडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नाशिक जिल्ह्यातील नार-पार परिसरातील अतिरिक्त पाणी गिरणा खोऱ्यात वळविण्याची ही योजना असून, प्रकल्पासाठी सुमारे सहा ते सात हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात १०.६४ टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार असून, त्यातून नाशिक व जळगाव जिल्ह्यातील सुमारे १ लाख २३ हजार ७९० एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. धुळे तालुक्यातील काही गावे चाळीसगाव, मालेगाव व पारोळा तालुक्यांच्या सीमेलगत असल्याने बोरी नदी पट्ट्यातील गावांनाही या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे कुणाल पाटील यांनी सांगितले.

त्यांनी पुढे सांगितले की, गिरणा, मोसम, बोरी आणि कान्होळी नदी खोऱ्यातील भाग कायम दुष्काळग्रस्त राहिला आहे. धुळे तालुक्याच्या सीमेवरून जाणाऱ्या गिरणा-पांझण डाव्या कालव्याद्वारे बोरी पट्ट्यातील काही गावांना सिंचनासाठी पाणी दिले जात असले, तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे अनेक क्षेत्रे अजूनही सिंचनापासून वंचित आहेत. या पार्श्वभूमीवर नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पातील पाणी धुळे तालुक्यातील गावांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे केली आहे. यासाठी मंत्रालयीन स्तरावरही सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वाढ व विस्तारीकरणाची गरज

गिरणा डाव्या कालव्याच्या वाढ व विस्तारीकरणासाठी आपण दीर्घकाळ प्रयत्नशील असल्याचे सांगताना कुणाल पाटील म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत कालव्यातून मिळणारे पाणी अपुरे असल्याने शेकडो हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित राहत आहे. परिणामी, धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना आजही दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नार-पार-गिरणा प्रकल्पातून बोरी परिसरातील गावांना अधिक पाणी मिळावे आणि कालव्यांचे विस्तारीकरण करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. यामुळे सिंचन क्षेत्रात वाढ होऊन अधिकाधिक गावांना या प्रकल्पाचा लाभ मिळू शकेल, असेही त्यांनी नमूद केले.

२०१७ च्या बैठकीतही मांडली होती मागणी

नाशिक येथे तत्कालीन पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत २२ नोव्हेंबर २०१७ रोजी नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाबाबत आढावा बैठक झाली होती. त्या बैठकीतही माजी आमदार कुणाल पाटील यांनी धुळे तालुक्यातील बोरी पट्ट्यातील गावांना सिंचनासाठी पाणी मिळावे, अशी मागणी केली होती. त्यावेळी दादा भुसे यांनी या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT