धुळे : जिल्ह्यात बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर गोवंश हत्या तसेच कत्तलीसाठी जाणाऱ्या गुरांच्या प्रकरणांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी यांनी विशेष पथक तयार केले आहे. या पथकात एक अधिकारी आणि पाच अंमलदारांचा समावेश करण्यात आला आहे. नागरिकांनी त्यांना गो तस्करीची किंवा कत्तलीची माहिती मिळाल्यास या पथकासाठी जारी केलेल्या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
धुळे जिल्ह्यातुन जाणाऱ्या मुंबई आग्रा महामार्गावरून बकरी ईदच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक करण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. याच कारणावरून गोरक्षक आणि संबंधित तस्कर यांच्यामध्ये वादाचे प्रसंग देखील निर्माण झाले आहेत. तर अनेक वेळा गो रक्षकान समवेत गेलेल्या पोलीस पथकांवर देखील दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे यंदा असा कोणताही प्रकार होऊ नये यासाठी नवनियुक्त पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी यांनी तातडीने पावले उचलली आहेत.
यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या देखरेखीखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या पथकामध्ये एक उपनिरीक्षक व पाच अंमलदारांचा समावेश करण्यात आला असून जनतेला संपर्कासाठी एक भ्रमणध्वनी क्रमांक देखील जाहीर करण्यात आला आहे. या पथकामध्ये पोउनि. अमित प्रविण माळी, पोहेकॉ मच्छिद्र साहेबराव पाटील, दिनेश प्रकाशचंद्र परदेशी,
हेमंत प्रकाश बोरसे, योगेश सुभाष चव्हाण,प्रल्हाद सुकदेव वाघ यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या विशेष पथकाला संपर्क करण्यासाठी 9545361003 हा भ्रमणध्वनी क्रमांक देण्यात आला आहे. गोवंशाची वाहतूक किंवा कत्तलीसाठी गोवंश घेऊन वाहने जात असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी या क्रमांकावर माहिती द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे आवाहन देखील पोलीस अधीक्षक सिंगुरी यांनी केले आहे.