धुळे

Dhule News : पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात फळांचा राजा उशिरा मोहरला

गणेश सोनवणे

पिंपळनेर(जि. धुळे) : पुढारी वृत्तसेवा-आंबट-गोड चवीने व रसाळ गुणधर्मामुळेच लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वामध्ये लोकप्रिय असणारे फळ म्हणजे आंबा होय. तो फळांचा राजा असून पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील कुडाशी, वासॉ, उमरपाटा, सुरज्यामाळ, हनुमंतपाडा, बल्हाणे आदी शेतशीवारामध्ये उशिरा पण चांगलाच मोहोर आलेला आहे. वातावरणाचा फटका बसल्याने यंदा मित्र कंपनीसह नातेवाईकांना आमरसाची अविट गोडी चाखायला कमी प्रमाणात मिळणार असल्याचे एकंदरीत परिस्थितीवरुन दिसते. यंदा भरपूर पाऊस झाला नसला तरी डिसेंबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसाच्या हजेरीने आंब्याला म्हणावा तसा चांगला फायदा झाल्याचे दिसत नाही.

सध्यास्थितीत तलाव विहिरींना कुठेच मुबलक पाणी नाही. परंतु यंदा थंडीसह पोषक वातावरणामुळे आंब्यासाठी प्रतिकूल हवामान ठरले आहे. त्यामुळे आंब्याला मोहर फुटण्यास सुरूवात झाली. तसे पाहता डिसेंबर महिन्याच्या शेवटी आंब्याला मोहर फुटायला लागतो. परंतु यंदा पावसाळा लांबला गेल्याने थंडीला उशिरा सुरूवात झाली. त्यामुळे यावर्षी जानेवारीच्या अखेरीस गावरान झाडांना मोहर येण्यास सुरूवात झाली .यावर्षीच्या वातावरणातील बदलाचा सर्वच पिकांवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. पूर्वी ग्रामीण भागात गावाच्या आजूबाजूला आमराई असायची. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला आंब्याची किंमत वाटायची नाही. परंतु कालांतराने वृक्षतोड माफियाकडून या फळांच्या झाडाची कत्तल झाली. त्यामुळे ही आमराई नामशेष झाली आहे. त्यामुळे गावागावात मिळणारे आंब्याचे उत्पादन घटले आहे. आता काही शेतकऱ्यांकडे थोडी फार आंब्याची झाडे आहेत. त्या झाडांना मोहर फुटलेला नजरेस पडत आहे. त्यामुळे चांगले उत्पादन येण्याची आशा शेतकरी बाळगून आहे. गत वर्षी दुष्काळ परिस्थिती होती. परंतु थंडी मात्र कडाक्याची होती. परिणामी मोठ्या प्रमाणात झाडांना मोहर दिसत होता उत्पन्न चांगले मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा वाटत होती. मात्र अवकाळी पावसाचा फटका व बदलत्या हवामानामुळे मोहर गळून गेला होता.त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली होती. यंदा सुध्दा अधूनमधून पडलेल्या दाट धुक्यामुळे आंब्याच्या मोहराला फटका बसला असल्याचे शेतकरी सांगत आहेत. पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यासह परिसरात आंबा बहरल्याने सुगंधी दरवळत आहे.

आम्रपाली, दशहरी जातीला पसंती

गावरान आंबा जानेवारीच्या ऐवजी फेब्रुवारीत मोहरला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात गावरान आंबा मिळणार की नाही,असा प्रश्न शेतक-यांसमोर आहे.पिंपळनेर परिसरात बहुतांश शेतकरी आंब्याच्या आम्रपाली, दशहरी जातीला आपली पसंती देतात. आंब्याचे पीक वातावरणातील बदलांवर अवलंबून असते.वातावरणाची साथ मिळत नसल्याने चिंता वाढली आहे.

गावरान आंब्याची चव मिळणे कठीण

गेल्या तीन-चार वर्षाच्या तुलनेत यावर्षी गावरान आंब्याला फुलोर म्हणावे तसा आलाच नाही. त्यामुळे गावरान आंब्याची चव मिळणे कठीण झाले आहे. यंदा अपेक्षित उत्पादन हाती येणार की नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.यावर्षी पाऊस अपुरा पडला व गावरान आंब्याच्या फुटीवेळी अवकाळी पाऊस व धुके पडल्याने या वर्षी गावरान आंच्याचा फुलोरा गळाला आहे.त्यामुळे गावरान आंब्याची फुट झाली नाही व शेतकऱ्याचे नुकसान झाले. यावर्षी अवकाळी पाऊस व धुक्याचा फटका आंबा पिकाला फटका बसला आहे. डिसेंबरमध्ये सतत धुके पडल्याने बहुतांश आंब्याचा मोहर जागेवरच जळाला आहे. तर काही शेतकऱ्यांना आब्याच्या दुसऱ्या फुटीची अपेक्षा आहे. दिनेश पंखेवाले शेतकरी,धोंगडे(घड्याळे शिवार)

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT