धुळे : पुढारी वृत्तसेवा-खुल्या प्रवर्गातील परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील ज्या लाभार्थ्यांना शासनाच्या इतर योजना, संस्था, महामंडळे यांचा लाभ मिळत नाही, अशा घटकांनी 'अमृत' (महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण संस्था, पुणे) यांच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपले जीवन उन्नत बनवावे, असे आवाहन 'अमृत'चे अधिकारी तथा धुळे-नंदूरबार जिल्ह्यांचे पालक अधिकारी हरिष भामरे यांनी केले.
धुळे शहरातील आई एकविरा माता मंदीर येथे 'अमृत' संस्थेच्या अधिकार्यांची लाभार्थी व समाजातील विविध घटकांशी समन्वय बैठक पार पडली. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भामरे बोलत होते.
याप्रसंगी बोलताना भामरे म्हणाले, की 'अमृत' हा राज्य सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प असून, या संस्थेच्या विविध योजनांचा लाभ आपल्याला गरजुंपर्यंत पोहोचवायचा आहे. यावेळी त्यांनी 'अमृत' संस्थेबद्दल, संस्थेच्या विविध योजनांबद्दल, वैयक्तिक व गट कर्जावरील व्याज परतावा योजना, एमपीएससी, यूपीएससी, नोकरी, कृषी जोडधंदे, लघुउद्योग अशा संदर्भातील विविध योजनांची सविस्तर माहिती लाभार्थी व उपस्थित मान्यवरांना दिली. त्याचप्रमाणे लाभार्थ्यांना योजनेचा फायदा घेता यावा, यासाठी विविध कागदपत्रांची पूर्तता कशी करावी, याबद्दल सखोल मार्गदर्शनही केले.
या कार्यक्रमाला 'अमृत'चे धुळे जिल्हा समन्वयक शेखर कुलकर्णी व गोपाल शर्मा यांच्यासह अॅड. नीलेश पाठक, हेमंत शर्मा, विनोद खंडेलवाल, बालकृष्ण शर्मा, चंद्रकांत पंडित, गिरीश तिवारी, किशोर पाठक, मिलिंद टेंभरेकर, अनिल दीक्षित, संतोष शर्मा, आई एकविरा मंदीर ट्रस्टचे विश्वस्त सोमनाथ गुरव, संजीव सिंग, कुलकर्णी आदी मान्यवरांसह शहर व जिल्ह्यातील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.