धुळे पुढारी वृत्तसेवा
जगभरात इंधन पुरवठ्याचे संकट निर्माण झालेले असताना राज्य शासनातर्फ सार्वजनिक वाहतुकीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वच आगारांना शिवाई ई-बस उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामध्ये धुळे आगारालाही १० ई-बस प्राप्त झाल्या आहेत. या बससेवेचे आज उद्घाटन झाले असून, या पर्यावरणपूरक ई-बससेवेमुळे इंधनाच्या बचतीला चालना मिळेल, असे प्रतिपादन शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी आज येथे केले.
राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे आगाराला १० ई-बस प्राप्त झाल्या असून, या बससेवेचे आज सकाळी आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे, विभागीय वाहतूक अधिकारी उमेश बिरारी, आगार व्यवस्थापक पंकज देवरे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक हर्शल पाटील, आस्थापना पर्यवेक्षक समाधान खांडेकर, विभागीय वाहतूक अधीक्षक संजय अवस्थी, कनिष्ठ आगार व्यवस्थापक मनोज पवार, वाहतूक निरीक्षक संतोष काळे, मनोज पाटील यांच्यासह महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रवाशांसाठी विविध सुविधा : आ. अग्रवाल
या बससेवेच्या उद्घाटनप्रसंगी आमदार अग्रवाल म्हणाले की, धुळे आगाराला पहिल्या टप्प्यात शासनाकडून १० ई-बस प्राप्त झाल्या आहेत. आणखी २० ते ३० बस प्राप्त होतील. या इलेक्ट्रिक बस पर्यावरणपूरक व प्रदूषणविरहित असतील. तसेच या ई-बसमुळे इंधन बचतीलाही चालना मिळणार आहे.
या बस चार्जिंग करण्यासाठी धुळे आगारात ८ चार्जिंग स्टेशन कार्यान्वित करण्यात आले आहेत. या ई-बस एकदा चार्जिंग केल्यानंतर सुमारे ३०० किलोमीटरपर्यंत चालतील. पहिल्या टप्प्यात धुळे ते नाशिक, धुळे ते जळगाव व धुळे ते छत्रपती संभाजीनगर अशा फेऱ्या सुरू असतील. पुश बॅक सीट, मोबाईल चार्जिंग, वातानुकूलित आदी सुविधांमुळे व आकर्षक बांधणीमुळे या बस प्रवाशांच्याही पसंतीस उतरतील, असा विश्वासही आमदार अग्रवाल यांनी व्यक्त केला.
सर्व योजनांचा मिळेल लाभ : व्यवहारे
विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे यांनी सांगितले, धुळे विभागातील नऊ आगारांपैकी सात आगारांना टप्प्याटप्प्याने या ई-बस प्राप्त होतील. सध्या अन्य आगारांमध्ये चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम सुरू असून, ते पूर्ण होताच ई-बससेवेला प्रारंभ होईल. तसेच शासनाकडून टप्प्याटप्प्याने ई-बस प्राप्त होतील. या पर्यावरणपूरक ई- बससेवेमुळे जगावर ओढवलेल्या इंधन संकटावर काही अंशी मात करण्यास मदत होईल.
या ई-बसमध्ये आरामदायी प्रवासाची सुविधा असून, राज्य परिवहन महामंडळ व शासनाकडून पूर्वीपासून सुरू असलेल्या महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग लाभार्थी तसेच आवडेल तेथे प्रवास आदी सवलतीच्या योजनांचा लाभही या ई-बससेवेसाठी मिळणार आहे. यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीसाठी एसटी महामंडळाच्या पर्यावरणपूरक ई-बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही व्यवहारे यांनी केले.