धुळे : शिंदखेडा तालुक्यातील चिरणे शिवारातील शेतमजुरांना पाण्यातून विषबाधा झाल्याची घटना बुधवारी (दि.२१) सायंकाळी घडली. यात त्रास होत असलेल्या २९ जणांना शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
शिंदखेडा तालुक्यातील पाटण परिसरातील शेतमजूर चिरणे कदाणे परिसरात शेतकामासाठी गेले होते .आज (बुधवारी) दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान २९ मजुरांना अचानक मळमळ, उलटी, चक्कर येणे आणि डोकेदुखीचा तीव्र त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तातडीने शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्व मजुरांना पाण्यातून विषबाधा झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान मजुरांवर वेळीच उपचार करण्यात आल्यामुळे त्यांची प्रकृती धोकाबाहेर असल्याची माहिती देखील वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. सद्यस्थितीत शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात एक पुरुष, १२ महिला आणि १८ लहान मुले व मुली अशा २९ जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.