Dhule Vidhyarthi Akrosh Morcha Pudhari
धुळे

ABVP Protest Dhule |शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात धुळ्यात 'अभाविप'च्या वतीने ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा’

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

Dhule Vidhyarthi Akrosh Morcha

धुळे : शिक्षण क्षेत्रात वाढत्या बाजारीकरणाविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) वतीने धुळ्यात ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

अभाविप धुळे शाखेच्या वतीने आयोजित हा मोर्चा शहरातील मा. ध. पालेशा महाविद्यालयाच्या गेटपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. जिल्ह्यातील कृषी, आयटीआय, वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र तसेच इतर शैक्षणिक संस्थांमधील शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी या मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा केवळ निदर्शने नसून महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर शासनाला जागे करण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया आयोजकांनी व्यक्त केली.

मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांनी बॅनर व फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सादर करण्यात आलेल्या निवेदनात अभाविपने राज्यातील २२ प्रमुख शैक्षणिक समस्यांकडे लक्ष वेधले.

मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे :

  • अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षा शुल्क पूर्णतः माफ करावे तसेच सर्व स्पर्धा परीक्षांचे शुल्क कमी करावे.

  • विद्यार्थिनींच्या मोफत शिक्षणाच्या घोषणेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी.

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथील परीक्षा व निकालातील गोंधळ थांबवून वेळेवर गुणपत्रिका द्याव्यात.

  • महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील रिक्त प्राध्यापक पदे भरावीत, परीक्षा शुल्क कमी करावे तसेच इंटर्न्स व रेसिडेंट डॉक्टरांना स्टायपेंड वाढवावे.

  • प्रलंबित शिष्यवृत्ती, विद्यावेतन व निर्वाह भत्ता तात्काळ विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करावेत.

  • शासकीय वसतिगृहे, आयटीआय इमारती व उपकरणांचे नूतनीकरण करावे.

  • एमएचसीआयटीसाठी सीयूईटीच्या धर्तीवर एकच अर्ज प्रक्रिया, कमी शुल्क व सुलभ प्रणाली लागू करावी.

  • महाविद्यालयीन खुल्या निवडणुका तात्काळ सुरू कराव्यात.

  • मराठी माध्यम शाळांची गुणवत्ता वाढवावी.

  • ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत बस पास द्यावा.

  • आयटीआय निर्वाह भत्ता त्वरित सुरू करावा.

  • पशुवैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी अंतनिर्वाह भत्ता व अधिछात्रवृत्ती लागू करावी.

  • कृषी विद्यापीठातील रिक्त पदे भरावीत.

अभाविपने राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन शांततेत मागण्या मांडल्या असल्याचे नमूद केले. मात्र शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

अभाविप देवगिरी प्रदेश सहमंत्री सुशांत एकोर्गे म्हणाले की, राज्यातील विविध विद्याशाखांतील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. परीक्षा शुल्कवाढ, शिष्यवृत्तीतील विलंब, रिक्त पदांमुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम तसेच ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या अडचणींमुळे शिक्षणव्यवस्था कमकुवत होत आहे. शासनाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर केवळ घोषणा न करता ठोस धोरणात्मक निर्णय घेऊन त्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी, अन्यथा अभाविप राज्यव्यापी आंदोलन उभारेल.

धुळे शहरमंत्री कुमारी मयुरी जाधव म्हणाल्या की, सरकारकडून मोठ्या घोषणा केल्या जातात; मात्र त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत नाही. विद्यार्थिनींचे मोफत शिक्षण असो किंवा आयटीआयचे विद्यावेतन, आम्हाला केवळ कागदोपत्री आश्वासने नकोत, तर ठोस कृती अपेक्षित आहे. या मोर्चात जिल्हा संयोजक लहानु कोळेकर, शिरपूर शहरमंत्री रुपेश कोष्टी, दोंडाईचा शहरमंत्री हिमांशू चित्ते तसेच मोर्चा प्रमुख मनिष कुलकर्णी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT