मनमाड - इंदूर रेल्वे मार्गासाठी 18 हजार कोटी  Railway File Photo
धुळे

मनमाड - इंदूर रेल्वे मार्गासाठी 18 हजार कोटी

पुढारी वृत्तसेवा

धुळे : भारत सरकारच्या कॅबिनेट बैठकीत मनमाड - धुळे - इंदोर रेल्वे मार्गाला तब्बल १८,०३६ कोटी रुपये इतका निधी मंजूर केला असून या संदर्भात खासदार शोभा बच्छाव आणि माजी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी स्वतंत्रपणे शासनाचे आभार मानले आहे. या रेल्वेमार्गासाठी लोकसंग्रामचे नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी मनमाड पासून इंदोर पर्यंतचा मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या आंदोलकांचे यश असल्याची प्रतिक्रिया लोकसंग्रामच्या वतीने देण्यात आली आहे.

मनमाड ते इंदोर रेल्वे मार्गासाठी गेल्या अनेक दशकांपासून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी खंडेराव बाजार समिती तसेच अनेक संघटनांनी आंदोलनाच्या माध्यमातून जनजागृती केली. यानंतर लोकसंग्रामच्या वतीने माजी आमदार अनिल गोटे यांनी पाठपुरावा सुरू केला. यासाठी या रेल्वे मार्गासाठी लोकसंग्राम पक्षाच्या वतीने माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली एकाच दिवशी मनमाड ते इंदोर दरम्यान मुंबई आग्रा महामार्गावर ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामुळे प्रथमच हा महामार्ग पूर्णपणे थांबला होता. या आंदोलनानंतर रेल्वे मार्गाच्या प्रश्नाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली. मात्र त्यानंतर झालेल्या सर्वेमुळे हा रेल्वेमार्ग रखडला होता. तत्कालीन खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी रेल्वे मार्गासाठी दहा वर्षांमध्ये केलेला पाठपुरावा आणि रेल्वे विभागाकडून होत असलेल्या कार्यवाहीची माहिती अनेक वेळा दिली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रेल्वेमार्गाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. त्यामुळे पुन्हा रेल्वे मार्गाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. दरम्यानच्या काळात बोरविहीर ते नरडाणा दरम्यानच्या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचे काम सुरू करण्यात आले. हा रेल्वे मार्ग मनमाड इंदूर या रेल्वे मार्गाचा भाग असल्याचा माहिती तत्कालीन खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या वतीने देण्यात आली होती.

तर दोन महिन्यांपूर्वी रेल्वे विभागाने या रेल्वे मार्गाची फाईल अर्थ विभागाकडे पाठवली असुन अर्थसंकल्पात या रेल्वे मार्गासाठी निधी मिळेल, यासाठी राज्य शासनाने रेल्वे विभागाकडे पाठपुरावा करावा, असे आवाहन एका पत्रकार परिषदेत माजी आमदार अनिल गोटे यांनी केले होते. या रेल्वे मार्गाचा मार्ग मोकळा झाला असून आता केवळ आर्थिक मंजुरी शिल्लक असल्याची माहिती देत असतानाच माझी आमदार गोटे यांच्या समर्थकांनी जल्लोष देखील केला होता. धुळ्याच्या नवनियुक्त खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांनी देखील रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन त्यांना या रेल्वे मार्गाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी साकडे घातले.

केंद्र सरकारने आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदार डॉ. शोभा बच्छाव यांची अधिवेशन काळात केलेली विनंती आता मान्य केली आहे. भारत सरकारच्या कॅबिनेट बैठकीत मनमाड - धुळे - इंदोर रेल्वे मार्गाला मान्यता दिल्याबद्दल खासदार शोभा बच्छाव यांनी केंद्र सरकारचे आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहे.

रेल्वे मंत्रालय, केंद्र मंत्रिमंडळाने ३०९ कि.मी. लांबीच्या नवीन रेल्वे लाईन प्रकल्पाला आर्थिक मंजुरी दिली असून मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक केंद्रांमध्ये सर्वात कमी रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी मंजूर प्रकल्प मुंबई आणि इंदूरला सर्वात लहान रेल्वे मार्गाने व्यावसायिक केंद्रे जोडण्या व्यतिरिक्त, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील कनेक्ट नसलेल्या भागांना महाराष्ट्रातील २ जिल्हयामधून आणि मध्य प्रदेशातील ४ जिल्हयामधून जोडेल. प्रकल्पाची एकूण किंमत रु. १८,०३६ कोटी आहे आणि २०२८-२९ पर्यंत पूर्ण होईल. या रेल्वे प्रकल्पाच्या बांधकामा दरम्यान सुमारे १०२ लाख मनुष्य दिवसांसाठी थेट रोजगारही निर्माण होणार आहे. मनमाड - धुळे - इंदोर रेल्वे मार्गाला कॅबिनेट बैठकीत आर्थिक मंजुरी मिळाल्याने खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी केंद्र सरकारचे आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहे.

केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्वाचे आभार- डॉ.सुभाष भामरे

बोरविहीर - नरडाणा रेल्वेमार्गाच्या कामासंदर्भातही डॉ.सुभाष भामरे यांनी म्हटले आहे की, बोरविहीर ते नरडाणा हा रेल्वेमार्ग मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाचाच एक भाग असून तो पहिला टप्पा असल्याने त्याचे काम वेगाने पुर्ण करण्यासाठी माझा प्रयत्न आहे. त्यातूनच जमीन संपादनाची प्रक्रिया सुरु करीत ती आता अंतिम टप्प्यात आली आहे. मनमाड इंदोर रेल्वे मार्गसाठी भरघोस असा निधी दिल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारमण तसेच रेल्वेमंत्री .अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, महाराष्ट्राचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी आभार मानतो. असेही खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी म्हटले आहे.

रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांचे यश

मनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी अभूतपूर्व रास्ता रोको आंदोलन झाले. या आंदोलकांच्या प्रयत्नाला यश आल्याची प्रतिक्रिया लोकसंग्रामच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. या रेल्वे मार्गासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून आपण पाठपुरावा सुरूच ठेवला होता. धुळ्यातील काही राजकीय नेत्यांनी पुन्हा रेल्वेमार्गाच्या कामात खोडा घालू नये, यासाठी आपण सातत्याने ना गडकरी यांच्या माध्यमातून केलेल्या या पाठपुराव्याला यश आले आहे ,अशी प्रतिक्रिया देखील माजी आमदार अनिल गोटे यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT