धुळे; पुढारी वृत्तसेवा : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशातील तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा घाट घातला असून अग्नीपथ योजनेमुळे तरुणांचे देशसेवेचे स्वप्न भंग केले आहे. अग्नीपथ योजना आणून केंद्रातील भाजप सरकारने तरुणांचा विश्वासघात केला आहे. या योजनेमुळे तरुण पुन्हा बेरोजगारीच्या खाईत लोटणार आहेत. त्यामुळे अग्नीपथ योजना तत्काळ मागे घ्यावी, या मागणीसाठी धुळे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन केले. धरणे आंदोलनानंतर धुळे तहसिलदार गायत्री सैंदाणे यांना निवेदन दिले.
अग्नीपथ योजनेविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील, प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली धुळे तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने धुळे तहसिल कार्यालयाशेजारी धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दरबारसिंग गिरासे, पं. स. चे माजी सदस्य पंढरीनाथ पाटील, काँग्रेस पक्षाचे सोमनाथ पाटील, खरेदी विक्रीचे संचालक बापू खैरनार, माजी सरपंच उमाकांत पाटील, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे, युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस पंकज चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.
नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या निवडणुकीपूर्वी वन रँक वन पेन्शनचा नारा दिला होता. पण सत्तेत आल्यानंतर या आश्वासनांचा त्यांना विसर पडला आणि सैन्यदलाचा विश्वासघात केला. चीन, पाकिस्तान, अफगाणिस्तानचा असलेला धोका ओळखून सैन्यदल अधिक सक्षम करणे गरजेचे असताना अग्नीपथ योजना आणून देशाची सुरक्षा व्यवस्था खिळखिळी करण्याचे काम केंद्रातील सरकारने केले आहे.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे सचिव डॉ. दरबारसिंग गिरासे, बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन लहू पाटील, पं. स. चे माजी सभापती भगवान गर्दे, मनपा विरोधी पक्षनेते साबीर शेख, तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशोक सुडके आदी उपस्थित होते.
हेही वाचलतं का ?