कर्जत: भाचीला सोडून गावी परतणार्या मामाचा अहिल्यानगर-सोलापूर रस्त्यावरील मिरजगाव (ता.कर्जत)जवळ उड्डाण पुलाखाली झालेल्या अपघातात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 4) सकाळी 10 वाजता घडली. अनिल कांबळे असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
ते कर्जत येथील श्री. अमरनाथ विद्यालयाचे कर्मचारी होते. श्री अमरनाथ विद्यालयाची शालेय सहल किल्ले रायगड व परिसरात गेली होती. कर्मचारी अनिल कांबळे सहलीसोबत गेले होते. शनिवारी (दि. 4) पहाटे विद्यालयाची सहल कर्जत येथे पोहोचली.
त्यानंतर ते सकाळी सहा वाजता दुचाकीवर भाचीला सोडण्यासाठी मिरजगाव येथे आले होते. भाचीला सोडल्यानंतर ते अहिल्यानगर-सोलापूर रस्त्याने मिरजगावपासून पुढे आल्यानंतर उड्डाणपुला खालून कर्जतकडे वळाले. त्यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली.
दुचाकी विजेच्या खांबावर जावून आदळली. त्यात कांबळे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. आधार कार्डच्या आधारे उपस्थित नागरिकांनी कर्जत येथे संपर्क करून माहिती दिली. दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर कर्जत येथे रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.