अहिल्यानगर : जिल्ह्यात 26 ते 28 सप्टेंबर या तीन दिवसांत विजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, आणखी तीन दिवस पावसाची शक्यता असल्याने पाथर्डी, शेवगाव, जामखेड, कर्जत आदी पूरपरिस्थिती कायम असलेल्या तालुक्यांत भीतीचे काहूर पसरले आहे.(Latest Ahilyanagar News)
गेल्या दहा दिवसांपासून जिल्हाभरात पाऊस सुरु आहे. पाथर्डी, शेवगाव, जामखेड, कर्जत, नगर, पारनेर आदी तालुक्यांत झालेल्या अतिवृष्टी आणि मुसळधार पावसाने लाखो हेक्टर खरीप पिके वाहून गेली. रस्ते पाण्याखाली गेले असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, पूरपरिस्थिती कायम आहे. या नैसर्गिक आपत्तीने विस्कळीत झालेले जनजीवन अद्याप स्थिर झाले नाही. अशा परिस्थितीत शुक्रवारपासून आणखी तीन दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे.
पूरस्थितीचा धोका
पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांतील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.
मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ नागरिकांनी उभे राहू नये. नदी, ओढे-नाल्यांवरील पुल व बंधाऱ्यांवरुन पाणी वाहत असल्यास पूल, बंधारे ओलांडू नयेत, जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने जनतेला केले आहे.
नदीपात्रांत विसर्ग सुरू
सध्या भीमा नदीवर दौंड पूल येथे 15 हजार 385 क्युसेक, गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून 6 हजार 310, प्रवरा नदीवरील ओझर बंधाऱ्यातून 1 हजार 156, मुळा धरणातून 1 हजार 200, घोड धरणातून 5 हजार, सीना धरणातून 4 हजार 604, कुकडी नदीवरील येडगांव धरणातून 500, हंगा नदीवरील विसापूर धरणातून 650, व खैरी धरणातून 922 क्यूसेक विसर्ग सुरू आहे.