‘टीईटी’मुळे 22 हजार गुरुजींची उडाली झोप; ‘सोशल’वरील ‘त्या’ आदेशाने खळबळ  Pudahri
अहिल्यानगर

TET Exam Compulsory: ‘टीईटी’मुळे 22 हजार गुरुजींची उडाली झोप; ‘सोशल’वरील ‘त्या’ आदेशाने खळबळ

‘खासगी, माध्यमिक’ संस्थांमधील नियुक्त्याही चर्चेत

पुढारी वृत्तसेवा

नगर: सुप्रिम कोर्टाच्या ‘टीईटी’वरील एका निकालाने प्राथमिक, खासगी, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिकच्या तब्बल 22 हजार गुरुजींची झोप उडवली आहे. नेमका हा निकाल काय आहे, याची सर्व शिक्षकांना उत्कंठा आहे. सध्यातरी, हा आदेश खरोखर लागू झालाच, तर ज्यांची पाच वर्षापेक्षा जास्त सेवा शिल्लक आहे, त्यांना नोकर्‍या टिकवण्यासाठी टीईटी पास व्हावीच लागणार आहे. तसेच ज्यांची सेवा पाच वर्षापेक्षा कमी आहे, त्यांना पदोन्नती घेण्यासाठी टीईटी लागणार आहे.

याबाबतची प्राथमिक माहिती अशी की, सुप्रीम कोर्टात 2019 मध्ये एक याचिका होती. त्यावर सुनावणी सुरू होती. त्याचा दि.1 सप्टेंबर 2025 रोजी निकाल लागला आहे. यामध्ये प्राप्त माहितीनुसार, दि.3 सप्टेंबर 2001 पूर्वी सेवेत आलेल्या शिक्षकांना टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) बंधनकारक नाही. (Latest Ahilyanagar News)

जे शिक्षक दि.3 सप्टेंबर 2001 ते दि.29 जुुुलै 2011 पर्यंत हजर झाले आहेत, त्या शिक्षकांना टीईटी लागू नाही. मात्र ज्यांची सेवा पाच वर्षापेक्षा अधिक राहिलेली असेल तर त्यांना ही परीक्षा उत्तीर्ण व्हावेच लागणार आहे. दि.29 जुुलै 2011 नंतर जे शिक्षक हजर झाले आहेत, त्यांना टीईटी पास होणे बंधनकारक आहे.

ज्यांच्याकडे टीईटी नसेल त्यांना थेट नोकरी गमवावी लागणार आहे. अर्थात त्यासाठी दोन वर्षांची मुदत असल्याचीही ‘त्या’ आदेशात चर्चा आहे. शिवाय, ज्यांची सेवा पाच वर्षे कमी असेल त्यांना ही परीक्षा बंधनकारक नाही. मात्र पाच वर्षापेक्षा जास्त सेवा ज्यांची बाकी असेल त्यांना टीईटी पास होणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील 22 हजारपैकी साधारणतः 15 ते 17 हजार शिक्षकांची सेवा पाच वर्षांपेक्षा अधिक शिल्लक आहे.

‘ते’ शिक्षक अडचणीत सापडणार?

खासगी तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या बहुतांशी शाळा ह्या राजकीय नेत्यांशी संलग्न असल्याचे दिसते. यात सध्या 12 हजार शिक्षक कार्यरत आहेत. संस्थांशी निगडीत शिक्षक भरती नेहमीच चर्चेत असते. यात अनेकदा टीईटी नसताना तात्पुरत्या स्वरुपात हजर करून घेतल्याचेही ऐकिवात आहे. त्यासाठी संस्था चालकांची ‘किंमत’ मोजावी लागल्याचेही अनेकदा पुढे आलेले आहे. आता टीईटी बंधनकारक झाल्यास संबंधित शिक्षकांना नोकर्‍या टिकवण्यासाठी परीक्षा÷उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

नेमके शिक्षक किती?

जिल्हा परिषदेच्या साधारणतः 4500 शाळा असून, यावर 10293 शिक्षक कार्यरत आहेत. यातील बहुतांशी शिक्षक टीईटी धारक आहेत. मात्र अनुकंपातील शिक्षकांना ही अडचण येऊ शकते. दुसरीकडे मात्र, खासगी 140 शाळा असून, त्यावर 97 मुख्याध्यापक, एक ते पाचवीचे 841 शिक्षक, सहावी ते आठवीचे 188 शिक्षक असे 1126 शिक्षक आहेत. तर माध्यमिक व उच्च माध्यमिकचे 10700 शिक्षक आहेत. असे जिल्ह्यात एकूण सुमारे 22 हजार शिक्षक आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT