संगमनेर : अठरा वर्षात त्यांनी फक्त 5 कोटी रुपये खर्च केले. आगामी अडीच वर्षात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आ.अमोल खताळ यांच्या माध्यमातून 25 कोटी रुपयांच्या विकास कामाचे नियोजन करून दुष्काळी भागाला सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न असल्याची ग्वाही पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली. (Ahilyanagar Latest News)
नान्नज दुमाला येथे डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते भोजापूर चारीचा जलपूजन सोहळा झाला. त्यावेळी ते बोलत होते. नीलम खताळ, माजी तालुकाध्यक्ष भीमराव चतर, शिवसेनेचे विठ्ठलराव घोरपडे, संदीप देशमुख उपस्थित होते.
डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, 40 वर्ष सत्तेत राहून पाणी न आणणार्यांना जनतेनं बाजूला केलं आणि महायुतीवर विश्वास ठेवला. आज त्या विश्वासाला उत्तर दिलं जात आहे. ‘ज्या दिवशी पाणी पोहोचेल, त्या दिवशीच मी इथे सभा घेईन, असा शब्द मी पूर्वी दिला होता. आज तो दिवस आला आहे. ही केवळ सभा नाही तर जनतेच्या आश्वासनपूर्तीची साक्ष असल्याचे डॉ. विखे म्हणाले. आ.अमोल खताळ यांनी हा संपूर्ण भाग पाणीदार करण्यासाठी जिद्दीने पाठपुरावा केला. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून हा भाग आता जलसमृद्ध होतो आहे. त्यांच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात आली आणि त्यांनी ती यशस्वीपणे पार पाडल्याचा सार्थ अभिमान आहे.
नीलम खताळ म्हणाल्या, वर्षानुवर्षे महिलांनी पाण्यासाठी होरपळ सोसली. आज त्या प्रतीक्षेला न्याय मिळाला आहे. स्व.बाळासाहेब विखे पाटलांवर टीका करणार्यांनी चार दशके काय केले? आज विकासकामचं उत्तर जनतेसमोर आहे. पाणी हा हक्क आहे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून पाणी आल्याचे ज्येष्ठ नेते भीमराव चतर यांनी सांगितले.
‘ती’ भाषणं यशोधनला पोहचवावीत!
नीलम ताईंनी आमदार अमोल भाऊंना सांगा, ‘आम्ही विधानसभेत पाण्याविषयी विचारलेले प्रश्न अजूनही उत्तराशिवाय आहेत. ती भाषणे घेऊन यशोधन कार्यालयात पोहोचवावीत, जेणेकरून आम्हाला त्यांची उत्तरं मिळतील. ही जलक्रांती केवळ विकासाचे प्रतीक नाही, तर सत्तांतरानंतर जनतेच्या अपेक्षांना मिळालेलं ठोस उत्तर आहे. महायुतीच्या नेतृत्वात संगमनेर तालुका जल स्वावलंबनाच्या दिशेने पुढे जात आहे. पाणी, रस्ते, शेती, शिक्षण, आरोग्य क्षेत्रांतील कार्यक्षम नेतृत्वच खरा विकास घडवू शकते, असा ठाम विश्वास डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.