नगर : मढी ग्रामसभेने घेतलेल्या अधिकारात हस्तक्षेप करता येणार नाही. मात्र, या प्रकरणात गावकरी व प्रशासनाने एकत्र येऊन समन्वयाने निर्णय घेण्याची गरज आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला सूचना दिली असल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी विविध विभागांचा आढावा घेतल्यानंतर पालकमंत्री विखे पाटील पत्रकारांशी बोलत होते.
पाथर्डी तालुक्यातील मढीच्या कानिफनाथ यात्रा उत्सवात एका समाजाला व्यवसाय करण्यास बंदी घालण्याचा ठराव ग्रामसभेने पारित केला आहे. याबाबत पालकमंत्री विखे पाटील यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, ग्रामसभा ही संवैधानिक प्रक्रिया आहे. ते सर्वोच्च न्यायालयाने मान्य देखील केले आहे. त्यामुळे ग्रामसभेच्या अधिकारात हस्तक्षेप करता येणार नाही. तेथील नागरिकांची ती भावना आहे. मात्र, यामध्ये संघर्षाची भूमिका योग्य नाही. यातून मार्ग निघावा, यासाठी झेडपी सीईओ यांना दोन्ही बाजूंशी चर्चा करून मार्ग काढण्याची सूचना दिली असल्याचे विखे पाटील म्हणाले.
पुणे येथील स्वारगेट बसस्थानकावर झालेली घटना गंभीर आणि निंदनीय आहे. यामधून एसटी महामंडळाचा हजगर्जीपणा दिसून आला आहे. तेथील आगार प्रमुखांवर गुन्हा दाखल केला पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
भाजपमुळे लोकशाही धोक्यात आल्याचे वक्तव्य नुकतेच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केले. याकडे लक्ष वेधले असता, विखे पाटील म्हणाले की, ज्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे, त्यांच्याकडून अशीच वक्तव्ये अपेक्षित आहे.
अतिक्रमण हटाव मोहीम जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात सुरू आहे. ती काही कोणा व्यक्तींच्या विरोधात सुरू नाहीत. अहिल्यानगरचे बिहार कसे झाले याची उदाहरणे त्यांनी द्यावीत. पारनेरचा बिहार त्यांनीच केला होता. त्यामुळेच तेथील लोकांनी विधानसभेत परिवर्तन घडवून आणले. सध्या परिस्थिती सुधारत आहे. असा टोला विखे पाटील यांनी नाव न घेता खासदार नीलेश लंके यांना लगावला.