`अहिल्यानगर केंद्रावर 63 व्या मराठी राज्य नाट्य स्पर्धा पार पडली. मात्र, निकालानंतर स्पर्धेला गालबोट लागले. निकाल पत्रात खडाखोड करून दुजाभाव केल्याचा ठपका ठेवत तृतीय विजेत्यासह सहा संघांनी पारितोषिके नाकारली. निकालावर 6 संघानी नाराजी व्यक्त केली असून त्यांनी मिळालेली एकूण चौदा पारितोषिक नाकारत असल्याचे पत्र सांस्कृतिक संचालनालयाला दिले आहे.
महाराष्ट्र सरकार गेल्या कित्येक वर्षांपासून (इ.स. 1961 पासून) राज्यातील सर्व कलांचे जतन, संवर्धन व त्यांमध्ये संशोधन करण्यासाठी नाट्य, साहित्य, नृत्य, संगीत, लोककला, दृक्कला व चित्रपट या कलांना समृद्ध आणि सक्षम करण्याचे व कलावंतांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ निर्माण करून सन्मान देण्याचे कार्य करीत आहे. 25 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर 2024 या कालावधीत अहिल्यानगर केंद्रावर एकूण 17 नाटकांपैकी 14 नाटके सादर झाली. मात्र, निकाल लागल्यानंतर निकालाबाबत प्रचंड मोठ्या प्रमाणात संशय कल्लोळ निर्माण झाला. निकालावर 6 संघानी नाराजी व्यक्त केली असून त्यांनी मिळालेली एकूण चौदा पारितोषिक नाकारत असल्याचे पत्र सांस्कृतिक संचालनालयाला दिले आहे.
या नाराज झालेल्या संघांनी माहितीच्या अधिकारात मागवलेल्या निकालात खाडाखोड असल्याचे आढळले आहे. पारितोषिक नाकारलेल्या संघामध्ये जय बजरंग युवा सांस्कृतिक क्रीडा ग्रामीण शिक्षण मंडळाने सांघिक तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकासह पुरुष अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र, प्रकाश योजना द्वितीय क्रमांक, नेपथ्य द्वितीय क्रमांक, रंगभूषा द्वितीय क्रमांक ही पारितोषिके नाकारली असून वात्सल्य प्रतिष्ठान या संस्थेने प्रकाशयोजना प्रथम क्रमांक, तसेच स्त्री व पुरुष अभिनयाची गुणवत्ता प्रमाणपत्रे नाकारली आहेत.
नाट्य आराधना या संस्थेने स्त्री अभिनयाचे रौप्यपदक तर कल्पद्रुम फाउंडेशन या संस्थेने प्रथम क्रमांकाचे नेपथ्याचे पारितोषिक नाकारले आहे. नाट्य मल्हार या संस्थेने पुरुष अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्राची दोन्ही पारितोषिके नाकारली आहेत. संगमनेर येथील संगम ग्राम विकास मंडळ या संस्थेने त्यांना जाहीर झालेले रंगभूषा प्रथम क्रमांक आणि स्त्री अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र ही दोन्ही पारितोषके नाकारली आहेत. या सर्व घडामोडींची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना निवेदनाद्वारे देण्यात आलेली आहे.