नगर: एसटी महामंडळाचा उन्हाळी गर्दीचा हंगाम सुरु झाला असून, महामंडळाने 15 एप्रिल ते 15 जून 2026 या दोन महिन्यांसाठी साध्या बसच्या तिकीट दरात प्रतिटप्पा 11.05 रुपये दरवाढ केली आहे. त्यामुळे आता नाशिकला जाण्यासाठी अधिकचे 32 रुपये मोजावे लागणार आहे.
एसटी महामंडळाच्या वतीने यापूर्वी फक्त दिवाळी सुटृीच्या कालावधीत महिनाभर भाडेवाढ केली जात होती. यंदा प्रथमच उन्हाळी सुट्रीच्या कालावधीत भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्य शासनाने मान्यता देखील दिली आहे. ही भाडेवाढ 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासूनच लागू झाली आहे. प्रवाशांना नगरहून कल्याणला जाण्यासाठी 33 रुपये, शेगावला जाण्यासाठी 59 रुपये, धुळ्याला 40 रुपये अधिकचे मोजावे लागणार आहेत.
शाळा, महाविद्यालयांना दीड ते दोन महिने सुटृी लागते. त्यामुळे कुटुंबाची सहल तसेच लग्नसराई आदी कारणामुळे बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी होऊन बस हाऊसफूल धावतात. याचा फायदा महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी घेतला आहे. दरम्यान, प्रवाशांनी सुरक्षिततेसाठी अवैध प्रवाशी वाहनांमधून प्रवास न करता एसटी महामंडळाला सहकार्य करावे असे आवाहन नगर विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांनी केले आहे. महामंडळाच्या साध्या बसने गोरगरिब जनता प्रवास करीत आहे. या भाडेवाढीचा आर्थिक फटका मात्र, या जनतेला बसला आहे.