नगर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाताना महायुती राहावी व महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जाव्यात ही शिवसेनेची अपेक्षा आहे. तरी समन्वय समितीच्या अहवालानुसार निवडणुका कशाप्रकारे लढवायच्या? हे तिन्ही पक्षाचे प्रमुख निर्णय घेणार असल्याचे सूतोवाच पर्यटन मंत्री तथा संपर्क नेते शंभूराज देसाई यांनी काढले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माऊली सभागृहात पार पडलेल्या शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. (Latest Ahilyanagar News)
मंत्री देसाई म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात कमी, पण परफेक्ट काम करून दाखवतात. कार्यकर्त्यांवर बारीक लक्ष देणारा व सर्वसामान्यांची प्रश्न सोडविणारा नेता पक्षाला लाभला आहे. शिवसेनेत शिस्तबद्ध काम सुरू आहे. सक्रिय सदस्यांना संधी दिली जाणार आहे. निवडणुकांपूर्वी सर्व रिक्तपदे भरली जाणार आहे. कोट्याप्रमाणे सर्व पदाधिकार्यांना सदस्य नोंदणी करावयाची असून, याचा तालुका निहाय आढावा घेतला जाणार आहे.
पक्षाचे मिळालेले पद लोकांच्या उपयोगी आले पाहिजे. आठवड्यातून दोन दिवस पक्षासाठी देण्याचे आवाहन त्यांनी करून जिल्हा नियोजनमधून पालकमंत्र्यांनी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकार्यांना विकासकामांसाठी उपलब्ध करून देण्याचे सांगितले.
आ. अमोल खताळ यांनी, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आल्याने, मतदारही शिवसेनेमागे उभा राहण्यास तयार असल्याचे सांगितले. आ. विठ्ठलराव लंघे यांनी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कष्टाने शिवसेना पुढे घेऊन जात असून, आगामी निवडणुकांमध्ये ग्रामपंचायत ते जिल्हा परिषदेत भगवा फडकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून व दीपप्रज्ज्वनाने मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. मंत्री देसाई यांच्या हस्ते कार्यकर्त्यांना विविध पदाची नियुक्तीपत्रे देण्यात आली. त्यांच्या उपस्थितीत पंचायत समिती सदस्य राहुल गवळी, अतुल लोखंडे, वसंतराव खतारे, विनोद गायकवाड, माजी नगरसेवक दशरथ शिंदे आदींनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.
स्वागत जिल्हाप्रमुख अनिल शिंदे व शहरप्रमुख सचिन जाधव यांनी केले. प्रास्ताविक संभाजी कदम यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र टाक यांनी केले. आभार दिलीप सातपुते यांनी मानले.
नाकारलेल्यांकडून ईव्हीएमवर अपयशाचे खापर
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी महाराष्ट्रातील निवडणुकीत फिक्सिंगचा आरोप करतात. परंतु ज्या राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले, तेथे फिक्सिंगचा आरोप करत नाहीत. ईव्हीएमच्या अनुषंगाने दाखल झालेल्या याचिकेच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम मशिन हॅक करता येत नसल्याचे स्पष्ट केले आहे.
ज्या पक्षाला जनतेने नाकारले, ते पक्ष ईव्हीएमवर अपयशाचे खापर फोडतात, असे सांगून जिल्ह्यातील भुईकोट किल्ला, पिंपळगाव माळवी येथील जागेच्या पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन मंत्री देसाई यांनी या वेळी दिले.
खर्या शिवसेनेला कौल
शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार नाकारल्याने ठाकरेंची ही अवस्था झाली आहे. जनतेनेही विधानसभा निवडणुकीत खर्या शिवसेनेला कौल दिलेला आहे. आता ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहेत. याबाबत मात्र अधिकृत प्रवक्तयाने भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यावर बोलणे योग्य नाही, असे मंत्री देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पंचनाम्यासाठी संयुक्त पथक
राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसामुळे भुईमूग, बाजरी, कांदा आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा निधी मिळण्यासाठी पंचनामे करून प्रस्ताव पाठविला जाणार आहे. महसूल, कृषी आणि ग्रामविकास अधिकारी यांचे संयुक्त पथक पंचनामे करण्यासाठी तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे तत्काळ पंचनामे करून प्रस्ताव तयार केले जातील.