नगर : महानगरपालिकेने सोमवारी सकाळपासून पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली. झेंडीगेट परिसरात प्रभाग समिती कार्यालय व अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने सकाळी आठ वाजता कारवाई सुरूवात केली. झेंडीगेट येथे अतिक्रमित जागेत सुरू असलेल्या दोन कत्तलखान्यावर पोलिस बंदोबस्तात कारवाई करीत जेबीसीच्या सह्याने जमीनदोस्त केले. रस्त्यावरील पत्र्याचे शेड, टपर्या हटविल्याने परिसर मोकळा झाला.
शहरात व उपनगर परिसरात अतिक्रमण मोहिमेसाठी महानगरपालिका प्रशासनाने महिनाभराचे नियोजन केलेले आहे. त्याची माहितीही वेळापत्रकासह सार्वजनिक करण्यात आलेली आहे. यापूर्वीही मागील एक - दोन महिन्यात महानगरपालिकेने अतिक्रमणांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली होती. गेल्या दोन महिन्यात 485 अतिक्रमणे व 755 हून अधिक अनधिकृत बॅनर, होर्डिंग हटवण्यात आले आहेत. आता पुन्हा शहरामध्ये कारवाई सुरू करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी झेंडीगेट परिसरात अनधिकृतपणे बांधण्यात आलेले पत्र्याचे शेड, टपर्या कारवाई करून हटवण्यात आल्या. यात दोन अनधिकृत कत्तलखाने जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. महानगरपालिकेने दिलेल्या वेळापत्रकानुसार व नियोजनानुसार अतिक्रमण कारवाई सुरू राहणार आहे. नागरिकांनी अतिक्रमण केले असल्यास, ते तात्काळ काढून घ्यावे. दरम्यान, यापुढे अतिक्रमण हटाव मोहीम केवळ कार्यालयीन वेळेत सीमित न राहता पहाटे सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत चालूच राहणार असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आहे.
ही कारवाई अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख आदित्य बल्लाळ, अभियंता सुरेश इथापे, रिजवान शेख, प्रभाग अधिकारी श्याम गोडाळकर, देविदास बिज्जा यांच्या पथकाने केली.
प्रभाग समिती तीनच्या झेंडीगेट येथील कार्यालय व महापालिकेच्या शाळेजवळच कत्तलखाना सुरू होता. तो कत्तलखाना महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून करण्यात आला होता. गेल्या कित्तेक दिवसांपासून कत्तलखाना सुरू होता. त्याला आशीर्वाद कोणाचा होता, अशी चर्चा नगरकरांमध्ये सुरू आहे.