नगर: जिल्ह्यात खरीप पेरणी 101 टक्के झाली असून, 1 लाख 48 हजार 384 हेक्टरवर कापूस तर 1 लाख 82 हजार 988 हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. कापूस वाढीच्या व बोेंडे लागण्याच्या तर सोयाबीन शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. मात्र, कापसावर रस शोषणारी कीड, मकावर लष्करी अळी तर सोयाबीन पिकावर उंट अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. (Latest Ahilyanagar News)
यंदा खरीप पेरणीसाठी 7 लाख 16 हजार209 हेक्टर क्षेत्र निश्चित केले असून, आतापर्यंत 7 लाख 23 हजार 627 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. मका पिकाची 139 टक्के म्हणजे 1 लाख 9 हजार 97 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. भाताचा पेरा 100 टक्के म्हणजे 18 हजार 748 हेक्टर क्षेत्रावर झाला आहे. बाजरीला यंदा हवा तसा प्रतिसाद शेतकर्यांनी दिला नाही. आतापर्यंत फक्त 70 टक्के पेरणी झाली. तूर, उडदाची पेरणी शंभर तर मुगाचा पेरा 94 टक्के झाला आहे.
जवळपास सर्वच पिकांची वाढ सुरु असून, भाताचे पीक समाधानकारक आहे. बाजरी पिकाला फुटवे फुटले असून, बाजरी फुलोरा आणि पक्क्वतेच्या अवस्थेत आहे. तूर वाढीच्या अवस्थेत असून, समाधानकारक आहे. कापसाला पाते फुटत असून, बोंडे लागण्याच्या अवस्थेत आहे. मात्र या पिकाला रस शोषणारी कीड आणि फुलकिडे लागले आहेत. पाथर्डी, राहुरी तालुक्यांतील पिकावर मावा व तुडतुडे किडाचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीवर येऊन ठेपला आहे.
शेवगाव तालुक्यात फुलकिडींचा प्रादुर्भाव तर नेवासा तालुक्यात कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
सहा तालुक्यांत मका अडचणीत
जिल्ह्यात मकाची लागवड 1 लाख 10 हजार हेक्टरवर झाली. हे पीक कणसे लागण्याच्या आणि पक्कवतेच्या अवस्थेत आहे. मात्र, या पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. अकोले तालुक्यात मका आर्थिक अडचणीत आहे. नगर, कोपरगाव, नेवासा, पारनेर व संगमनेर या पाच तालुक्यांत लष्करी अळीने बेजार केले आहे. त्यामुळे शेतकर्यांना आर्थिक झळ बसण्याची शक्यता आहे.