राहुरी: महात्मा फुले कृषी विद्यापीठातील यंत्रसामग्री, मनुष्यबळ आणि संसाधने थेट अधिकाऱ्यांच्या खासगी शेतात वापरली जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रकरणात, एक सहायक प्राध्यापक विद्यापीठाच्या मालकीचा ट्रॅक्टर स्वतःच्या शेतात वापरत असल्याचा प्रकार उघडकीस आला. काही नागरिकांनी त्याचे चित्रीकरण करून विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाला माहिती दिली.
सुरक्षा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन ट्रॅक्टरसह संबंधिताला पकडले. शासकीय मालमत्तेचा असा बिनधास्त गैरवापर होत असताना प्रशासन गप्प का, असा प्रश्न विचारला जात आहे. या संदर्भात बियाणे विभागाचे प्रमुख डॉ. नरेंद्र काशिद यांनी कारवाईला दुजोरा दिला असून याबाबतचा अहवाल संशोधन संचालकांकडे सादर झाल्याचे सांगितले. मात्र, यापूर्वीच्या अनेक प्रकरणांचा अनुभव पाहता या प्रकरणातही केवळ चौकशीचा देखावा करून संबंधिताला वाचवले जाणार का, अशी चर्चा रंगली आहे.
विद्यापीठातील संशोधन आणि साधनसामग्री शेतकऱ्यांच्या हितासाठी वापरली जाणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात अधिकाऱ्यांच्या खासगी फायद्यासाठी त्यांचा वापर होत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, जळगाव येथे विद्यापीठाच्या साहित्याचा गैरवापर, बेकायदेशीर वृक्षतोड, तसेच आर्थिक अपहाराच्या आरोपांनंतरही अंतिम कारवाई प्रलंबितच असल्याचे समजते.
विद्यापीठातील बांधकाम विभागाचा कारभारही संशयाच्या भोवऱ्यात आहे. कोट्यवधी रुपयांच्या कामांचे तुकडे करून ठेके देणे, नियमबाह्य नियुक्त्या आणि आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकतेचा अभाव अशा आरोपांबाबत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आढावा बैठक घेत पोलखोल केली होती. मात्र त्यानंतरही परिस्थितीत काहीच बदल झाला नसल्याचा आरोप होत आहे. उलट पुन्हा तेच प्रकार जोमात सुरू असल्याचेही बोलले जात आहे.
यापूर्वीही विद्यापीठातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सेवा पुस्तकात खाडाखोड करून शासकीय सेवेचा लाभ घेतल्याची तक्रार करण्यात आली होती. या सर्व पार्श्वभूमीवर ट्रॅक्टर प्रकरणात शासन आणि विद्यापीठ प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.