पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र File Photo
अहिल्यानगर

Nilesh Lanke: पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र

पुढारी वृत्तसेवा

टाकळी ढोकेश्वर: नगर जिल्ह्यात पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र लिहून तातडीने पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.

खासदार लंके यांनी पत्रात म्हटले की, तूर, कपाशी, सोयाबीन, मका, वाटाणा यांसह खरिपातील इतर पिके पावसामुळे पाण्याखाली गेली आहेत. काही भागांत दुष्काळसदृश परिस्थितीत पिके खुंटलेली असतानाच अचानक झालेल्या पावसाने शेतकर्‍यांच्या आशा पाण्यात गेल्या. (Latest Ahilyanagar News)

विशेषतः शेवगांव तालुक्यातील खामगांव, हिंगणगाव, गुंफा, जोहरापूर, भातकुडगांव, तसेच राहुरी, नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड व पाथर्डी तालुक्यातील अनेक गावांतील शेतकर्‍यांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी असल्याचे खासदार लंके यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले.

शेतकर्‍यांनी मोठ्या खर्चाने खते व औषधे टाकून पिके उभी केली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे कपाशी पिवळी पडली, सोयाबीनची फुले गळून पडली तर तूर व वाटाणा पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, या नुकसानीचे पंचनामे न झाल्याने शेतकरी रोष व्यक्त करीत आहेत.

तातडीने पंचनामे करा

महसूल व कृषी विभागाने तातडीने नुकसानग्रस्त भागात जाऊन पंचनामे करावेत व शासनस्तरावरून शेतकर्‍यांना त्वरित नुकसानभरपाई मिळावी. शेतकर्‍यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे, त्यामुळे तत्काळ दिलासा मिळणे गरजेचे आहे असे त्यांनी खासदार लंके यांनी पत्राक नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT