नेवासा : अवकाळी पाऊस अन् वादळाने तालुक्यात केळी, गहू, कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले. देडगाव येथे अंगावर वीज पडून म्हैस दगावली. तीन ठिकाणी झाडांवर वीज कोसळली. एकंदर वादळी पावसाने शेतकर्यांचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
पावसाने झालेल्या नुकसानीची आमदार विठ्ठल लंघे यांनी प्रांताधिकारी सुधीर पाटील तहसीलदार डॉ.संजय बिरादार, तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे, गटविकास अधिकारी संजय लखवाल, कृषी सहायक रुपेश पवार, सोनईचे पोलिस निरीक्षक माळी यांच्यासमवेत पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसीनीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
तालुक्यातील देडगाव, चांदा, जेऊर हैबती, पाचुंदा,माका, महालक्ष्मीहिवरे येथील शेतकर्यांच्या गहू, केळी, कांदा व भाजीपाल्यासह आंबा बागांचे गुरुवारी (दि. 3) रात्री झालेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. देडगाव येथील शेतकर्याची एक म्हैस वीज पडून दगावली आहे. शुक्रवारी सकाळी तातडीने आमदार विठ्ठल लंघे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत प्रांताधिकारी सुधीर पाटील, नेवाशाचे तहसीलदार डॉ.संजय बिरादार, तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे, गटविकास अधिकारी संजय लखवाल, कृषी सहायक रुपेश पवार, सोनईचे पोलिस निरीक्षक माळी आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेकर्यांच्या पिकांचा पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या.
रामदास कांदे यांचे बोरीचे एक मोठे झाड वादळाने उन्मळून जनावरांच्या शेडवर कोसळले. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, संरक्षक भिंत तसेच पत्र्यांचे मोठे नुकसान झाले. केळी, गहू, कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कांदे झाकण्यासाठी शेतकर्यांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी गहू भुईसपाट झाला. आंब्याच्या कैर्यांचा सडा पडला होता. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.
दरम्यान, तालुक्यातील चांदा परिसरामध्ये वादळी वार्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. तीन ठिकाणी वीज पडली, तर वादळामुळे वीजपुरवठा खंडिीत झाला. पावसामुळे चांदा येथे काढणीस आलेल्या कांद्याचे नुकसान झाले. तेथील कालव्यालगत वेड्या बाभळीच्या झाडावर वीज कोसळली. चारी नंबर सहालगत असलेल्या विठ्ठल जावळे यांच्या वस्तीवरील नारळाच्या झाडावर वीज पडून नारळाचे झाड जळाले. बर्हाणपूर येथील राजेंद्र बाबूराव चव्हाण यांच्या नारळाच्या झाडावर वीज पडून नारळाचे झाड जळाले.
तेवीस तास वीज खंडित
वादळामुळे घोडेगाव येथून चांदा गावठाणला वीज पुरवठा करणारे मेन लाईनचे दोन खांब पडले. त्यामुळे या भागाचा 23 तास वीजपुरवठा बंद झाला होता. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाली.