अहिल्यानगर: तामिळनाडूमध्ये जर 72 टक्के आरक्षण देता येऊ शकते, तर राज्यघटनेत बदल करून महाराष्ट्रातील मराठा समाजालाही न्याय देता येऊ शकतो. आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल, तर घटनादुरुस्ती आवश्यक आहे, असे विधान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी येथील एका कार्यक्रमात बोलताना केले.
मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. यावर पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना स्पष्ट भूमिका मांडण्याचे आव्हान दिले होते. (Latest Ahilyanagar News)
या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी स्पष्ट केले की, मराठा समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षण हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. केंद्र सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन वेळप्रसंगी संसदेत घटनादुरुस्ती करणे आवश्यक आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बावन्न टक्क्यांची आरक्षण मर्यादा घालून दिली असली तरी तामिळनाडूसारख्या राज्यातील 72 टक्के आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले. त्यामुळेच महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले.