नगर: २००२ मधील मतदारयादीशी जुळणी न झालेल्या ५ लाख ५८ हजार ८४८ तर मतदारयादीच्या मजकुरात विसंगती आढळून आलेल्या १ लाख ५९ हजार ६१६ अशा एकूण ७ लाख १८ हजार ४६४ मतदारांना ३१ ऑगस्टनंतर नोटिसा बजावण्यात येणार आहेत. या मतदारांची सुनावणी घेण्यासाठी ४३६ राजपत्रित अधिकार्यांची नियुक्ती होणार आहे.
जिल्ह्यातील ३८ लाख १० हजार १०२ मतदारयादीसाठी विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेतंर्गत ८८.७८ टक्के मतदारांच्या अर्जांची मोहिमेतंर्गत संगणकीकरण करण्यात आले असून, असंकलित मतदार वगळून ३३ लाख ८२ हजार मतदारांची प्रारुप मतदारयादी ३१ ऑगस्ट रोजी प्रसिध्द होणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांनी सांगितले.
जुळणी न झालेल्या तसेच नावात, आडनावात विसंगती आढळून आलेल्या मतदारांची ३१ ऑगस्टनंतर सुनावणी घेतली जाणार आहे. ही सुनावणी मंडल कार्यालयस्तरावर किंवा गावपातळीवरील तलाठी कार्यालयात घेतली जाणार आहे.
सुनावणीसाठी वर्ग-२ चे अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. संबंधित मतदारांना बीएलओमार्फत समक्ष तसेच व्हॉट्सॲप किंवा ईमेलद्वारे नोटिसा बजावल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, सुनावणीची पूर्वतयारी म्हणून उपजिल्हा निवडणूक अधिकारी गाढे यांनी गुरुवारी (दि.२७) अकोले तहसील कार्यालयात तालुक्याच्या कामकाजाचा आढावा घेतला. सुनावणीचे योग्य पद्धतीने नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना दिले आहेत.
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार
अकोले: ३०९७४, संगमनेर : ३१८३३, शिर्डी : ५४७४४, कोपरगाव : ६०६०२, श्रीरामपूर : ३७७०९, नेवासा : ५३१७१, शेवगाव : ६७६१३, राहुरी : ७४४४७, पारनेर : ६११२१, अहमदनगर शहर : १०२८८६, श्रीगोंदा : ७२८९४, कर्जत-जामखेड : ७०४७०