खरीप पिके धोक्यात; शेतकरी अडचणीत Pudhari
अहिल्यानगर

Kharif Crop: खरीप पिके धोक्यात; शेतकरी अडचणीत

पंचनामे करून मदत करा; सरपंच प्रियंका लामखडे यांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

नगर तालुका: नगर तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके धोक्यात आली आहेत. अनेक भागात पिके कोमजण्यास सुरुवात झाली आहे. पावसाच्या ताणामुळे उत्पन्नात मोठी घट होणार आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडणार असून तत्काळ नुकसान होत असलेल्या पिकांचे पंचनामे करावेत, तसेच शेतकर्‍यांना आर्थिक मदत करण्याची मागणी निंबळकच्या सरपंच प्रियंका लामखडे यांनी केली आहे.

नगर तालुक्यात मे महिन्यात मान्सूनपूर्व पाऊस झाला होता. तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसावर बहुतांश शेतकर्‍यांनी खरिपाच्या पेरण्या उरकल्या आहेत. तालुक्यात सरासरी 91 टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. बाजरी, मूग, सोयाबीन, उडीद, तूर, तसेच विविध पिकांच्या पेरण्या करण्यात आल्या आहेत. मृग व आर्द्रा नक्षत्रावर पाऊस होईल. याबाबत शेतकर्‍यांची मोठी अपेक्षा होती. (Latest Ahilyanagar News)

परंतु पावसाने निराशाच केली. त्यामुळे तालुक्यातील बहुतांशी भागात पिके कोमजण्यास सुरुवात झाली आहे. काही भागात पिके हिरवी दिसत असली, तरी पाण्याचा ताण पडल्याने पिकांना बहार कमी प्रमाणात येणार आहे. परिणामी उत्पन्नात मोठी घट होणार आहे. पावसाअभावी पिके कोमजण्यास सुरुवात झाली आहे.

खरीप पिकांबाबत शेतकर्‍यांमध्ये उत्पन्नाची शाश्वती राहिली नाही. तालुक्यात सुमारे 50 हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या करण्यात आल्या आहेत. शेतीची मशागत, बियाणे, औषधांची फवारणी, यासाठी शेतकर्‍यांना मोठा खर्च करावा लागला आहे. परंतु पावसाने निराशा केल्याने शेतकरी वर्गामध्ये मोठी चिंता पसरली आहे.

शेतकरी अडचणीत सापडलेला असताना राज्याचे कृषिमंत्री पत्ते खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होतो, ही दुर्दैवी घटना आहे. या घटनेचा निषेध करते. संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे करून शेतकर्‍यांना आर्थिक सहकार्य करण्याची गरज आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ सर्व पिकांची पाहणी करून पंचनामे करत आर्थिक मदत देण्याची मागणी निंबळक गावच्या सरपंच प्रियंका लामखडे यांनी केली आहे.

नगर तालुक्यातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेतीच आहे. येथील शेतीला शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नसल्याने शेती व्यवसाय पूर्णतः पावसावर अवलंबून असतो. निसर्गाच्या लहरीपणाचा नेहमीच फटका शेतकर्‍यांना बसतो. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडतात. चालू वर्षी खरीप हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात वाताहात झाली आहे.

तालुक्यातील सर्व भागातील पिकांची पाहणी करावी. ज्या पिकांना पावसाअभावी फटका बसला आहे, अशा पिकांचे पंचनामे करावेत. खरीप पिके वाया गेलेल्या शेतकर्‍यांना तत्काळ आर्थिक मदत करावी. अन्यथा खासदार नीलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील निर्णय घेण्यात येईल.
- प्रियंका लामखडे, सरपंच, निंबळक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT