वळण: गेल्या काही दिवसांपासून केंदळ खुर्द शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. प्रवाशांवरील हल्ल्यांचे प्रमाणही वाढले आहे. बुधवारी रात्री देखील साडेआठच्या दरम्यान दुचाकीवरील जाणाऱ्या व्यक्तींवर बिबट्याने जीवघेणा हल्ला चढवला.
यात एकाच्या डाव्या पायाला इजा झाली आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली असून या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
सध्या राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील केंदळ, मांजरी, वळण , पाथरे, मानोरी, आरडगाव आदि गाव, वाड्या वस्त्यांवर दररोज कोठे ना कोठे बिबट्यांचा शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर तसेच माणसावर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी येथील एका गुंजाळ नामक दुचाकी स्वारावर देखील अशाच प्रकारे बिबट्याने हल्ला केला होता.
ते यातून थोडक्यात बचावले होते. त्याही वेळी बिबट्याने मोटरसायकलवर हल्ला चढवला असता दुधाचे कॅनमुळे गुंजाळ हे थोडक्यात बचावले होते. तर गेल्या आठवड्यात येथीलच दीपक बाचकर, प्रकाश हापसे, मुकुंद आढाव, या दूध उत्पादक शेतकऱ्यावर, दुचाकी स्वरांवर अशाच प्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. त्यानंतर पुन्हा बिबट्याने हल्ला चढवल्याचे दिसले.
केंदळ खुर्द-ब्राह्मणी शिव रस्त्यावरून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव विजय आढाव व डॉ.संदीप गुंजाळ हे व्हिजिट करता दुचाकीवरून जात होते. उसाच्या शेतात रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने डॉ. गौरव यांच्यावर हल्ला चढवला.
यावेळी बिबट्याने डाव्या पायाचा नख्याची वरखडे लागले. तातडीने डॉ. गुंजाळ यांनी त्यांना टाकळीमिया येथील दवाखान्यात हलविले. तेथे प्राथमिक उपचार केला असून काल गुरुवारी त्यांना अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात आल्याचे समजले.
दरम्यान घटनेची माहिती जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अनिल आढाव यांनी वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिली. वनरक्षक आर.सी आरगडे यांनी तातडीने पिंजरा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.