कर्जत: कर्जत शहरातील मुख्य रस्त्यासाठी तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र, एवढी मोठी रक्कम खर्च करूनही आज हा रस्ता अक्षरशः खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. यंदा समाधानकारक पाऊसही झाला नसतानाही रस्त्याची झालेली दुरवस्था पाहता कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या रस्त्याचे काम ए सी कोठारी कन्स्ट्रक्शनने केले असून, काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. रस्त्यावरील डांबर अनेक ठिकाणी उखडून गेले असून मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघातांची मालिका सुरू झाली आहे.
शाळकरी मुले-मुली, दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिकना या रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक दुचाकीस्वार खड्ड्यांमध्ये घसरून जखमी झाले असून चारचाकी वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. मुख्य बाजारपेठेतील हा रस्ता असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या रस्त्याची देखभाल करण्याची जबाबदारी असलेला ठेकेदार मागील अनेक महिन्यांपासून गायब असल्याची चर्चा आहे. तरीही बांधकाम विभागाकडून कोणतीही प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दोन कोटी रुपये खर्च झाले नेमके कुठे? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. एवढा निधी खर्च करूनही काही महिन्यांतच रस्ता उखडत असेल, तर कामाची गुणवत्ता कोणी तपासली? संबंधित अधिकाऱ्यांनी याचे उत्तर द्यावे, अशी मागणी होत आहे.
संबंधित ठेकेदारावर तसेच बांधकामच्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, रस्त्याची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि दर्जेदार पद्धतीने रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ठेकेदारावर गुन्हा दाखल करा
कोट्यवधी रुपये खर्च करूनही नागरिकांना खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागत असेल, तर हा विकास नेमका कोणासाठी? असा संतप्त सवाल आता कर्जतकर विचारू लागले आहेत. निकृष्ट काम केल्याप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.