नगर: गेल्या तीन चार दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर सुरु असल्यामुळे भंडारदर्यासह मुळा,निळवंडे, आढळा धरणांत पाण्याची आवक सुरु आहे. गेल्या ३६ तासांत भंडारदरा धरणात तब्बल पावणेदोन टीएमसी आवक झाली. त्यामुळे हे धरण गुरुवारी सायंकाळी ९० टक्के भरले होते.
भंडारदरा धरणातून गुरुवारी (दि.२३) सायंकाळी ७ वाजता ४ हजार २७२ क्यूसेकने विसर्ग सुरु आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत मुळा धरणात ६७८ दलघफू, तर निळवंडे धरणात ३९१, आढळा धरणात ७४ दलघफू इतकी पाण्याची आवक झाली आहे.
बुधवारी सकाळी ६ वाजता भंडारदरा धरणात ८ हजार १२४ दलघफू, निळवंडे धरणात ३ हजार१५१, मुळा धरणात ११ हजार १३५ तर आढळा ९३१ दलघफू इतका पाणीसाठा होता.
गेल्या २४ तासांत म्हणजे गुरुवारी सकाळी ६ वाजेपर्यंत या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. भंडारदरा येथे १७५ मिलिमीटर, निळवंडे येथे ४८, अकोल्यात १७, रतनवाडीत २४८, घाटघर ३०५, पांजरेत १७६, वाकीत १७२ तर कोतूळ येथे ५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
त्यामुळे भंडारदरा धरणात बुधवारी सकाळी ६ ते गुरुवारी सकाळी ६ वाजेपर्यंत १ हजार ९५ दलघफू तर सांयकाळी ६ वाजेपर्यंत ६४८ दलघफू आवक झाली. एकंदरीत ३६ तासांत भंडारदरा धरणात १ हजार ७४३ दलघफू इतके नवीन पाणी दाखल झाले आहे. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी ६ वाजता हे धरण ९० टक्के भरल्याची नोंद झाली आहे.
‘मुळा, निळवंडेत’ही वाढ
निळवंडे धरणात देखील २४ तासात वाढ झाली. जवळपास ४०० दलघफू इतका पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे गुरुवारी (दि.२३)सकाळी ६ वाजता या धरणात ३ हजार ५४२ दलघफू इतका पाणीसाठा नोंद होता. निळवंडे धरणातदेखील गेल्या २४ तासांत ६७८ दलघफू इतकी वाढ झाली आहे. आढळा धरणात ७४ दलघफू इतकी वाढ झाली आहे.
मुळा धरणात सायंकाळी 12,200 दलघफू पाणीसाठा झाला होता. धरणात 10 हजार क्यूसेकने आवक सुरू होती. त्यामुळे शुक्रवारी (आज) उशीरापर्यंत मुळा धरण 50 टक्के भरण्याची आशा उंचावली आहे. झपाट्याने वाढताना दिसत आहे.
भंडारदरा धरणातून ४ हजार २७२ क्यूसेकने विसर्ग सुरु आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी केले आहे.
आढळा, भोजापूर ओव्हर फ्लो
संगमनेर-देवठाण : अकोले तालुक्यातील देवठाण येथील आढळा आणि संगमनेर तालुक्यातील भोजापूर धरण काल गुरुवारी (दि. २३) पूर्ण क्षमतेने भरले. दरम्यान, दोन्ही धरणांतून ओव्हर फ्लोचे पाणी नदीपात्रासह पूर चारीला सोडण्यात आले आहे.
अकोले तालुक्यातील देवठाण, विरगाव, हिवरगाव, पिंपळगाव, गणोरे, डोंगरगाव तसेच संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग, धांदरफळ, कुंजीरा पिंपळगाव, वडगाव लांडगा, राजापूर, चिकणी, चिखली, निमगाव, भोजापूर व सिन्नर तालुक्यातील नळवाडी व कासरवाडी ही दोन गावे आढळा धरणाच्या लाभक्षेत्रात आहेत. त्यामुळे आढळा धरण भरणे अकोले, संगमनेर, सिन्नर तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.
धरण भरल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाच्या वातावरण निर्माण झाले आहे. ओव्हर फ्लो पाणी आता आढळा नदीपात्रातून धावू लागले आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी सावध राहण्याचे आवाहन अकोले पाटबंधारे खात्याचे उपकार्यकारी अभियंता प्रदीप शेवाळे आणि संगमनेरचे उपकार्यकारी अभियंता योगेश जोर्वेकर यांनी केले आहे.
दरम्यान, पाटबंधारे खात्याने सोमवारी (दि. २७) सकाळी नऊ वाजता आ. डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते शासकीय जलपूजन कार्यक्रम आयोजन केला आहे. तर, संगमनेर तालुक्यातील भोजापूर धरण भरल्याने पूर चारीवर अवलंबून असणारे गावातील बंधारे भरले जाणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी समाधानी झाला आहे.
सिन्नर तालुक्यात म्हाळुंगी नदीवर ३६१ दशलक्ष घनफूट क्षमतेचे भोजापुर धरण आहे. या धरणातील पाण्यावर संगमनेर व सिन्नर या दोन तालुक्यातील काहीगावातील शेतकरी अवलंबून आहे. या धरणाच्या ओव्हरफ्लोचे पाणी बंधाऱ्यांना सोडण्याचे नियोजन नाशिक जलसंपदा विभाग यांनी केले आहे.
दरम्यान, जलसंपदा विभागाकडून आवर्तनाचे नियोजन बद्ध व्यवस्थापन करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक जलसंपदा विभागाचे जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता सुभाष पगारे यांनी दिली.