अहिल्यानगर : मुसळधार पावसाने सीना नदीला आलेल्या पुराचे पाणी कल्याण रोड, नेप्ती नाका परिसरातील घरात शिरले. पुराच्या पाण्यात वेढलेल्या 40 जणांना महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाने रेस्क्यू ऑपरेशन करत सुरक्षित बाहेर काढले.
सीना दुथडी भरून वाहत असून पुराचे पाणी नागरी वसाहती, घरांमध्ये पाणी शिरले आहे. हवामान खात्याचा इशारा पाहता महापालिकेची आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणा सज्ज असून, नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे. (Latest Ahilyanagar News)
आमदार संग्राम जगताप, आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी शहरातील परिस्थितीची पाहणी केली. स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्यासमवेत गोरे वस्ती, डॉन बॉस्को, ठाणगे मळा, दातरंगे मळा, नेप्ती नाका व सावेडी परिसराची पाहणी केली. तेथील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांना धीर देण्यात आला. तसेच महापालिका प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे आदेश आमदार संग्राम जगताप यांनी दिले. प्रभाग क्रमांक 8 मधील गोरे वस्ती, गणेश चौक, पितळे कॉलनी व संभाजीनगर भागात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर घरात शिरले आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघावा, यासाठी आंबेडकर चौक ते सीना नदीपर्यंत 900 एमएम व्यासाची गटार योजना लवकरच मार्गी लागेल, असेही आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.
आमदार संग्राम जगताप म्हणाले, सीना नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यासाठी मी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. कामालादेखील सुरुवात झाली होती. मात्र काही धनदांडग्या लोकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून स्थगिती मिळवली. आजच्या परिस्थितीत महापालिकेने पूरस्थितीची सविस्तर माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर करून नदीपात्रातील अतिक्रमणे हटविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
बाळाजी बुआ विहिरीमागे ठाणगे मळा, कवडे नगरजवळ पुराच्या पाण्याने घरात अडकलेले नागरिक, तसेच महानगरपालिका संपवेल येथील कामावरील कर्मचारी, लहान मुली, वयोवृद्ध व्यक्तींना बोटीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. अनेक वसाहतीमध्ये पाणी शिरले असून या भागात सक्शन मशीन, गाड्यांद्वारे पाणी काढण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेश चौक, बोल्हेगाव, केडगाव परिसर, रेल्वे स्टेशन परिसर या ठिकाणीही महानगरपालिकेच्या यंत्रणेकडून उपाययोजना सुरू असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.
नगर ः शनिवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे सीना नदीने रौद्ररूप धारण केले. सीना नदीकाठच्या रहिवाशांना पुरातून बाहेर काढण्यात आले. नालेगाव परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. (छाया : समीर मन्यार)