उंबरे: राज्य सरकारने ऐतिहासिक कर्जमुक्तीची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले आहे. आता केवायसीसाठी सेतू केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दीही वाढू लागली आहे. मात्र, राष्ट्रीयकृत बँकांनी कर्जमुक्तीच्या याद्यामध्ये गंभीर चुका केल्याने अनेक शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
जिल्ह्यात साधारणतः दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया तसेच जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी या पार्श्वभूमीवर वेळोवेळी बँकांसमवेत बैठका घेतल्या. शेतकऱ्यांचे आधार संलग्नीकरण, मृतांचे वारस नोंदीबाबत सूचना केल्या. त्यासाठी अगदी गावांगावांतही सोसायट्यांनाही आवश्यक मार्गदर्शन केले. त्यामुळे खासकरून जिल्हा बँकेच्या सभासद सोसायट्यांच्या कर्जदारांची सर्व माहिती अचूक अपलोड करण्यात आली. परंतु, राष्ट्रीयकृत बँकांनी विशेषतः महाराष्ट्र बँकेचा अक्षम्य निष्काळजीपणा पुढे आला आहे.
कर्जमुक्तीची यादी गावच्या फलकावर झळकल्यानंतर राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्जदारांची नावे चुकलेली आहेत, त्यांच्यासमोर थकबाकीची रक्कमही प्रत्यक्षात कर्जापेक्षा कमी दिसत आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांवर दोन लाखांचे कर्ज आहे, त्यांना 60-70 हजाराचीच थकबाकी दाखवून तेवढीच माफी मिळण्याची शक्यता आहे. अशा अनेक शेतकऱ्यांच्याबाबतीत चूका झाल्या आहेत.
मयत शेतकऱ्यांची नावे कर्जमुक्तीच्या यादीत आली, मात्र त्यांचे आधार प्रमाणीकरण कसे करायचे, यात आता किती वेळ लागणार, यापेक्षा बँकेने त्यांच्या वारसांची नावे शासनाकडे का पाठवली नाही, याविषयी संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतीत सखोल चौकशी करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी आर्त साद राहुरी तालुक्यातील शेतकरी घालत आहेत.
मयतांचे आधारप्रमाणिकरण कसे करायचे?
सरकारने कर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. मात्र, यात राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्जदारांच्या बाबतीत गोंधळ दिसत आहे. अनेक शेतकऱ्यांनी आमच्याकडे तक्रारी केल्या आहेत. काहींच्या वडिलांच्या नावे थकीत कर्ज आहे. वडील मयत आहेत. बँकेने कर्जाची माहिती पाठवताना त्यांच्या वारसाची माहिती शासनाकडे पाठवणे अपेक्षित असताना, त्यांनी मयताचे नाव पाठवले. आता मृत शेतकऱ्यांची नाव यादीत आले. त्यांचे आधारप्रमाणिकरण कसे करणार, तसेच थकबाकीही कर्जाच्या रक्कमेपेक्षा कमी दाखवली. याची जबाबदारी निश्चिती करावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे शिवसेनेचे नेते विलासराव ढोकणे यांनी सांगितले.
मायबाप सरकारने कर्जमुक्ती केल्याने मी त्यांचा मनापासून आभारी आहे. पण, 2020 मध्ये आईच्या नावे महाराष्ट्र बँकेत शेतीकर्ज घेतले होते. व्याजासह पावणेदोन लाखापर्यंत थकीत कर्ज आहे. मात्र, कर्जमुक्ती यादीत आमच्या नावापुढे 64 हजार रुपयांचीच थकबाकी दिसत आहे. आमच्या गावात अशा अनेक शेतकऱ्यांच्या चूका झाल्या आहेत. त्या दुरुस्त करून न्याय द्यावा.एकनाथ वाघ, शेतकरी उंबरे
मी महाराष्ट्र बँकेचा थकबाकीदार आहे. माझ्या नावापुढेही थकबाकीची रक्कम कमी दाखवली आहे. त्यामुळे तेवढेचे पैसे माफ होऊन, वरचे भरावे लागणार का, असा प्रश्न पडला आहे. बँकेने गावात येऊन याविषयी आम्हाला असे का घडले, याचे स्पष्टीकरण देऊन कर्जमुक्तीची हमी द्यावी.बाळकृष्ण पटारे, उंबरे