संगमनेर बस आगारातून तालुक्यातील घारगाव-बोटासह एकूणच पठार भागातील बहुतांश ठिकाणी बस सेवा सुरू झाली नाही. अनेक गावांमध्ये बससेवा खंडित झाल्याने येथील नागरिकांसह शेतकरी व विद्यार्थ्यांची माठी गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमिवर संतप्त झालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी थेट एसटी आगार प्रमुखांच्या दालनात ठिय्या मांडून आंदोलन केले.
परिवहन विभागाकडून संगमनेर तालुक्यातील घारगाव-बोटासह पठार भागात बर्याच ठिकाणी बस सेवा पुरविली नाही. अनेक गावांची बससेवा खंडित केल्याने नागरिकांसह शेतकरी व विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
मुळातच पठार भाग डोंगर - दर्यात विखुरला आहे. वाड्या, वस्त्यांसह अनेक गावांना जोडणारा दुवा म्हणून एसटी महामंडळकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जाते. तालुक्याच्या ठिकाणी कामासह शिक्षणानिमित्त जाण्यास बसने प्रवास करावा लागतो, मात्र परिवहन खात्याने बसचा तुडवडा व अन्य तांत्रिक कारणांमुळे पठारभागात अनेक ठिकाणी बससेवा रद्द केली आहे. पोखरी बाळेश्वर, तळेवाडी गावात बसेस पोहचत नसल्याने विद्यार्थ्यांना अक्षरशः दररोज पायपीट करावी लागते. यावेळी सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा, शेखर सोसे, रोहित काळे, सुमित पानसरे, सौरभ उमर्जी व विद्यार्थी उपस्थित होते.