श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान ग्रामपंचायतने काल 14 जानेवारी 2025 रोजी मकरसंक्रातीपासून गावामध्ये आरोग्यास घातक असणारे कागदी कप, प्लास्टिक कप वापरावर बंदी घातली आहे. त्यासाठी नियमावली तयार करण्यात आलेली आहे. या नियमाचे उल्लंघन्न करणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
कॅन्सर सारख्या आजारांना कारणीभूत असलेल्या चहाच्या कागदी कप वापरावर त्वरित बंदी घालणे बाबत. ग्रा.पं. कार्यालयमध्ये सर्व चहा व्यवसायिकांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकित चहाच्या कागदी कपांवर बंदी घालण्यात आली आहे. चहाचे कागदी कप बनविताना त्यामध्ये बीपीए नामक केमिकलचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. कागदी कपात गरम चहा किंवा पाणी टाकल्यास कपाच्या आतील मायक्रो प्लास्टिक वितळते आणि चहा घेतल्याने लाखो मायक्रो प्लास्टिकचे कण पोटात जातात ज्यामुळे हजारो नागरिकांना कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला सामोरे जावे लागते.
या झालेल्या बैठकित चहाचे कागदी कपांवर बंदी घालण्यात आली असून चहा विक्रेते यांचेकडे कागदी कप, प्लास्टिक कप आढळून आल्यास त्यांना पहिल्यावेळेस 500 रुपये, दुसर्या वेळेस पुन्हा आढळल्यास 1000 रुपये, तिसर्या वेळेस 1500 रुपये या प्रमाणे दंड रकमेमध्ये वाढ केली जाईल.
तसेच वारंवार आपणाकडून या आदेशाची पायमल्ली होत असल्यास आपला व्यवसाय परवाना ग्रामपंचायतकडून रद्द करण्यात येईल, अशा सूचना देण्यात आल्या.
गावातील सर्व चहा विक्रेते यांनी आपल्या दुकानातच नव्हे तर बाहेर चहाच्या घर पोहचसाठी सुद्धा कागदी कप, प्लास्टिक कप वापरावर बंदी घालावी, सर्व चहा विक्रेते यांनी घर पोहोच सेवा देत असताना चहा शौकीन यांचेसाठी स्वः खर्चाने जसे की, व्यावसायिक, बँका, शाळा, पतसंस्था, शासकीय कार्यालय आदि. ठिकाणी ग्राहकांच्या सोयीसाठी काचेचे ग्लास पुरवावे, तसेच चहा पिणार्यांनीही कागदी कप, प्लास्टिक कप यामधून चहा पिण्याचे टाळावे, तसेच घरगुतीही वापर टाळावा.
कागदी कप, प्लास्टिक कप बंदी ही चहा विक्रेते व चहा पिणारे शौकीन यांचे आरोग्यासाठी गरजेचे असल्याने दोघांनी या निर्णयाची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असे मत सरपंच अर्चना रणनवरे, उपसरपंच कान्हा खंडागळे, ग्रामविकास अधिकारी आर.एफ जाधव व सदस्यांनी व्यक्त केले.