Illegal Tree Cutting Pudhari File Photo
अहिल्यानगर

Illegal Tree Cutting: आश्वी परिसरात वृक्षतोडीचा धुमाकूळ!

या संपूर्ण लाकूड बाजारामागे मोठे आर्थिक रॅकेट सक्रिय असल्याची चर्चा असून, वन विभागाच्या संशयास्पद भूमिकेवर आता पर्यावरणप्रेमींनी थेट बोट ठेवले आहे.

पुढारी वृत्तसेवा

आश्वी: प्रवरा नदीवर दोन कालवे आणि निळवंडे धरणाच्या दोन कालव्यांमुळे सदैव हिरवागार आणि समृद्ध राहिलेला आश्वीचा बागायती पट्टा सध्या एका वेगळ्याच कारणाने होरपळत आहे. परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वृक्षतोड सुरू असून, वर्षानुवर्षे उभी असलेली मौल्यवान झाडे काही मिनिटांत भुईसपाट केली जात आहेत.

या संपूर्ण लाकूड बाजारामागे मोठे आर्थिक रॅकेट सक्रिय असल्याची चर्चा असून, वन विभागाच्या संशयास्पद भूमिकेवर आता पर्यावरणप्रेमींनी थेट बोट ठेवले आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, लिंब, चिंच, जांभूळ यांसारख्या पिढ्यानपिढ्या जतन केलेल्या मौल्यवान वृक्षांना लक्ष्य केले जात आहे. आधुनिक कटर आणि यंत्रसामग्रीच्या सहाय्याने अवघ्या काही मिनिटांत ही झाडे तोडली जातात. भरदिवसा लाकडाने गच्च भरलेली वाहने आश्वी परिसरातून बाहेर पडत असून, ही लाकडे थेट मोठ्या शहरांतील बाजारपेठेत पाठवली जात आहेत. हे सर्व सुरू असतानाही संबंधित यंत्रणा डोळे झाकून का बसली आहे? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

कोट्यवधींच्या वृक्षारोपणाला सुरुंग

एकीकडे राज्य शासन पर्यावरण संतुलनासाठी आणि वृक्षारोपणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी पाणीसारखा वाहत आहे. झाडे लावा, झाडे जगवाच्या घोषणा दिल्या जात आहेत. मात्र, दुसरीकडे आश्वी परिसरात सुरू असलेल्या या राजरोस कत्तलीमुळे शासनाच्या मोहिमेलाच सुरुंग लागत आहे. खाजगी जमिनीवरील झाडेही कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता थेट तस्करांच्या घशात घातली जात असल्याचा आरोप होत आहे.

या बेसुमार वृक्षतोडीमुळे परिसरात आधीच सक्रिय असलेल्या लाकूड तस्करांचे मनोबल कमालीचे वाढले आहे. वन विभाग आणि संबंधित यंत्रणेच्या नाकाखाली हा सर्व प्रकार घडत असल्याने, ‌‘यात अधिकारी आणि तस्करांचे काही साटेलोटे आहे का?‌‘ अशी जाहीर चर्चा आता चौकाचौकात रंगू लागली आहे. चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.

वादळात पडलेल्या झाडांचे गौडबंगाल काय?

मागील महिन्यात झालेल्या वादळामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग आणि इतर शासकीय जागांवरील अनेक जुनी झाडे उन्मळून पडली होती. नियमानुसार या पडलेल्या झाडांचा सविस्तर पंचनामा आणि शासकीय नोंद होणे गरजेचे होते. मात्र, या लाकडाची विल्हेवाट नेमकी कशी लावली गेली? याची कोणतीही पारदर्शक माहिती समोर आलेली नाही. यामध्ये मोठी अनियमितता झाल्याचा दाट संशय ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT