नगर : अहोरात्र रुग्णांच्या उपचारासाठी सेवेत तत्पर असलेल्या रुग्णवाहिका चालकांचे मागील दहा महिन्यांपासून पगार नाहीत. त्यामुळे अक्षरशः जिल्ह्यातील 102 चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या चालकांनी दोन दिवसांत आपले पगार न केल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, संबंधित एजन्सीने पगार न केल्यास रुग्णवाहिकांचे चाक थांबणार आहे आणि त्याचा थेट परिणाम रुग्णांना भोगावा लागणार आहे.
जिल्ह्यात 102 आरोग्य केंद्र आहेत. या आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. मात्र त्या चालविण्यासाठी जिल्हा परिषदेने कंत्राटी पद्धतीने एका एजन्सीव्दारे चालक घेतलेले आहेत. गेल्या वर्षी विन्सेल आणि दृष्टी अशा दोन कंपन्यांनी रुग्णवाहिकांना चालक पुरवठा केला होता. त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर जिल्हा परिषदेने रुग्णवाहिका चालकांसाठी नव्याने एजन्सीच्या निविदा मागाविल्या होत्या. यामध्ये पुण्याची बी बॉम फॅसिलिटीज नामक कंपनीला चालक पुरवठा करण्याचे काम मिळाले. जिल्हा परिषदेने चालकांच्या महिन्याच्या पगारापोटी 102 चालकांचे प्रत्येकी 17 हजार 582 रुपये प्रमाणे संबंधित एजन्सीला देण्याची तरतूद केली आहे. शासनाच्या निधीतून ही रक्कम दिली जाते.
दरम्यान, जुलै महिन्यापासून संबंधित कंपनीने चालकांचे पगार केलेले नाहीत. त्यामुळे कामानिमित्त झेडपीत आलेल्या चालकांनी एकत्रित येऊन आरोग्य विभागात आपले गार्हाणे मांडले. यावेळी जिल्हा परिषदेला विचारणा करावी तर आपली नियुक्तीच मुळात एजन्सीने केली आहे, त्यामुळे इकडे नाराजी व्यक्त करून उपयोग नाही. आपला पाठपुरावा एजन्सीकडेच करावा लागेल, याची चालकांना माहिती आहे .तरीही काल आरोग्य विभागात संबंधित चालक गेले होते.त्या ठिकाणाहून त्यांना एजन्सीला पेमेंटचे पैसे वर्ग केले आहेत, अशी माहिती देण्यात आली. त्यामुळ चालकांनी एजन्सीच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केल्याचे दिसले.
जिल्हा परिषदेत कर्मचार्यांच्या पगारापोटी 17 हजार 582 रुपया्ंप्रमाणे एजन्सीला पैसे देत आहेत. मात्र संबंधित एजन्सी चालकांना 11 ते 12 हजार रुपये देत असल्याचे समजते. त्यामुळे उर्वरित पाच हजारांची रक्कम नेमकी कुठे कपात होते, पीएफची रक्कम दरमहिन्याला कापली जात असेल तर ती नियमित भरली जाते का, त्याचे मेसेज मिळतात का, याविषयी चालकांना कोणतीही माहिती नसल्याचेही यावेळी समजले.